Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

बंदिश म्हणजे आरंभ आणि निरंतरता : पंडित सत्यशील देशपांडे

पुणे : संगीत हे प्रवाही आकारतत्त्व आहे; चित्र किंवा शिल्प यासारखे ते स्थिर नाही. बंदिशीच्या माध्यमाद्वारेच संगीत पेश केले जाते. कलाकाराने बंदिशीला आपल्या पद्धतीने, तब्येतीने उलगडत राहण्याची प्रक्रिया म्हणजेच अभिजात संगीत. खयाल संगीताचा स्वरौघ मागे वळून मुखड्याच्या उगमस्थानाकडे परत येतो, तो वाहवत जात नाही, असे अभ्यासपूर्ण विवेचन पंडित सत्यशील देशपांडे यांनी केले.
ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे शनिवारी खयाल विमर्श या उपक्रमाअंतर्गत पंडित सत्यशील देशपांडे यांनी शास्त्रीय संगीतातील बंदिशीची भूमिका या विषयावर रसिकांशी संवाद साधला. संवादात्मक कार्यक्रमाच्या पाचव्या भागाचे आयोजन गांधर्व महाविद्यालयील विष्णू विनायक स्वरमंदिरात करण्यात आले होते. पंडित देशपांडे यांना सृजन देशपांडे (सहगायन) आणि अभिजित बारटक्के (तबला) यांनी साथसंगत केली.
ग्वाल्हेर, जयपूर, किराणा, आग्रा या घराण्यातील गायकीचे सोदाहरण वैशिष्ट्य सांगत बंदिशींची भूमिका अधोरेखित केली. प्रत्येक आवर्तनाचे संचित हे पूर्वीच्या आवर्तनात घडलेल्या बऱ्या-वाईटांच्या खुणा आपल्याबरोबर वागवत असते. अशा अनेक आवर्तनांची श्रृंखला म्हणजेच अभिजात संगीत. बंदिश म्हणजे आरंभ आणि निरंतरता असते.
स्वरांची कधी एकमेकांशी जवळीक होते तर कधी ते अंतर राखून असतात. तीन-चार स्वराकृतींची धून होते आणि या धुनीची सप्तकावर चाल ठरविली, चलनाचा अंदाज बांधला की राग प्रत्यक्ष रूप धारण करतो. या चलन बांधण्याच्या आडाख्यात फरक पडला की एकाच रागाची विभिन्न रूपे अस्तित्वात येतात, अशी आपण बंदिशीची व्याख्या केली असल्याचे पंडित देशपांडे म्हणाले.
संगीत उलगडत जातानाचे सादरीकरण पूर्वनिश्चित नसते. एखाद्या रागाचा स्वरौघ नदीच्या विविध रूपांसारखा कधी नागमोडी, कधी शांत-विस्तिर्ण तर कधी हजारो झरे उरी बाळगणाऱ्या सहस्र धारेसारखा असतो. पण रागाचे चलन किंवा तालाची आवर्तने पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. उत्तर हिंदुस्थानी आणि दाक्षिणात्य रागसंगीताच्या शिक्षण पद्धतीतील फरक त्यांनी स्पष्ट केला. भिमपलास रागावर आधारित आठ बंदिशींची झलक दाखवित रागाच्या प्रांगणात उतरताना बंदिशीचा वापर करत जो गायक आपला खयाल रंगवेल तेवढी त्याला रसिकांकडून दाद मिळतेे, असे ते म्हणाले. पंडित कुमार गंधर्व, पंडित वसंतराव देशपांडे यांच्या गायकीची वैशिष्ट्ये त्यांनी रसिकांसमोर उलगडली.
सुरुवातीस ऋत्विक फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती संस्थेच्या समन्वयक रश्मी वाठारे यांनी प्रास्ताविकात दिली. कलाकारांचा सत्कार संस्थेचे संचालक प्रकाश गुरव यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading