Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

जाणीवा सखोल करणे हे रंगभूमीचे प्रयोजन: माधव वझे

पुणे : ‘जीवनाबद्दलच्या आपल्या जाणीवा सखोल करणं हे रंगभूमीचं प्रयोजन असून प्रेक्षकांनी त्या दिशेने जायला हवे, त्यांनी फक्त ऐंद्रीय अनुभवापर्यंत थांबता कामा नये’, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, समीक्षक माधव वझे यांनी केले.

ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थ्यांच्या कला व संस्कृती विशेष उद्दीष्ट गटातर्फे ‘ नाट्यकला आस्वाद ‘ विषयावर ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, समीक्षक माधव वझे यांचा ‘ नाट्यकला आस्वाद ‘ या विषयावर संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी रंगभूमीचे प्रयोजन, प्रवास, प्रेक्षकांची जबाबदारी अशा अनेक मुद्यांवर मते व्यक्त केली. शिरीष जोशी यांनी माधव वझे यांचा सत्कार केला.ज्ञान प्रबोधिनी( सदाशिव पेठ ) येथील प्रबोध सभागृहात २५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम झाला.कलांचा आस्वाद कसा घ्यावा या विषयी हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कला व संस्कृती विशेष उद्दिष्ट गटातर्फे मिलिंद संत यांनी स्वागत केले.ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, डॉ. विवेक कुलकर्णी , डॉ. सविता कुलकर्णी, डॉ.समीर दुबळे,श्रीनिवास देसाई इत्यादी उपस्थित होते

माधव वझे म्हणाले, ‘नट आणि प्रेक्षक यांच्यात परस्परात ताण निर्माण करण्याचा आणि तो सैल करण्याचा प्रयोग सुरू असतो. मानसिक, बौद्धिक ताण निर्माण झाला नाही, तर प्रयोग रंगत नाही.

प्रयोग पाहताना नटाबरोबर प्रेक्षकाचीही एक जबाबदारी असते, म्हणूनच तो रंगभूमीचा महत्वाचा घटक मानला जातो.

नाट्यप्रयोग ही अत्यंत जिवंत कला आहे. प्रेक्षक पूर्णपणे या खेळात उतरले नाहीत, तर तो प्रयोग रंगत नाही. नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, ध्वनी व्यवस्था असे पूरक घटक आहेत, पण नट, प्रेक्षक,सादरीकरणाची जागा हे महत्वाचे घटक आहेत. त्यातून रंगभूमी अनुभव देते. प्रेक्षक- नट यांच्या परस्पर विश्वासातून प्रयोग साकार होतो. नाट्यप्रयोग प्रेक्षकांना जीवनानुभव देत असतो, असेही वझे यांनी सांगितले.

अमूर्त गोष्टी रंगभूमीवर मूर्त स्वरुपात येतात. त्यात नेपथ्य, प्रकाश योजना, वेशभूषा प्रत्येक गोष्टीचे योगदान असते.यातील प्रत्येक गोष्टीचे स्वतंत्र अस्तित्व नसते, त्यांची एकमेकावर कुरघोडी असता कामा नये. मनोरंजन- शिक्षण हे नाटकाचे प्रयोजन असते, जुन्या परंपरांत न बसणाऱ्या अनेक मुद्दे, संकल्पना धाडसाने रंगभूमीवर येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. अनेक नाटककारांनी नाटक लिहिताना महिलांना नाटय प्रयोगात बोलू दिले नाही. महान असणाऱ्या नाटककारांना प्रेक्षकांनीही प्रतिसाद द्यायला हवा. प्रत्येक नाटकानंतर आपण प्रौढ, उदार मनस्क, समृद्ध व्हायला हवं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading