डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या जीवनात महाडचा सत्याग्रह करून प्रकाशाची वात पेटवली- माजी खासदार अमर साबळे
पुणे- विवेक विचार मंच व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, 20 मार्च महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘महाड सत्याग्रह आणि सामाजिक समतेचा लढा’ विषयावर ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करून आणि संविधानाची उद्देशिका वाचून करण्यात आली. मराठी विभागाच्या वतीने प्रा.डॉ.प्रभाकर देसाई सरांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. तसेच विवेक विचार मंचच्या वतीने डॉ. कुंडलिक पारधी यांनी विवेक विचार मंचबद्दल थोडक्यात माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माजी खासदार अमर साबळे यांनी महाड सत्याग्रह आणि सामाजिक समतेची लढा याचा संपूर्ण इतिहास मांडला. या सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इतर जातीधर्माच्या लोंकानी कसा पाठिंबा दिला तेही सांगितले. आपण हा दिवस प्रेरणा दिवस, अहिंसा व शांततेचे प्रतीक म्हणून कसा साजरा करू शकतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वापर करून कसा खोटा इतिहास पसरवला जातो. अशा लोंकापासुन समाजाने सावध राहिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मानवतावादी, अहिंसावादी आणि भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते होते, असे अमर साबळे यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या बागेश्री मंठाळकर, प्रा.डॉ.प्रभाकर देसाई आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुधाकर अहिरे यांनी केले. अनिल खिरडकर यांनी आभार प्रदर्शन केले.
