हल्ले होणे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने चांगलं लक्षण नाही – संजय राऊत
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर आज शिवाजी पार्कात हल्ला झाला. या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत पत्रकारांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले. मात्र, संदीप देशपांडे कोण?असा प्रतिसावलच त्यांनी उपस्थित केला. सुरुवातील पत्रकारांना वाटलं राऊतांनी नाव नीट ऐकलं नाही. त्यामुळे पत्रकारांनी संदीप देशपांडेंच्या नावाच पुनरुच्चार केला. मात्र, संदीप देशपांडे कोण? असा सवाल त्यांनी पुन्हा उपस्थित केला. दरम्यान, हल्ले होणे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने चांगलं लक्षण नाही. सामान्य माणूस असो वा इतर कोणीही सर्वांची सुरक्षा महत्त्वाची आहे, असंही पुढे संजय राऊत म्हणाले.
विधिमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, या संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे विधिमंडळात सत्ताधारी आक्रमक झालेले पहायला मिळाले. शिवसेना व भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आमदार नितेश राणे यांनी तर “संजय राऊतांची सुरक्षा १० मिनिटे हटवा. उद्या संजय राऊत दिसणार नाहीत”, अशा शब्दांत विधानसभेतच संजय राऊतांवर आगपाखड केली. त्यावर आता संजय राऊतांची नितेश राणेंना चॅलेंज देत हल्लाबोल केलाय. “नारायण राणे यांचा टिल्लू पोरगं मला धमकी देतंय, की विधानसभेत माझी सुरक्षा काढा, अरे तुझं सरकार आहे काढ ना सिक्युरिटी असं म्हणून त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.”, असं संजय राऊत यावेळी म्हटले. यापुढे बोलताना संजय राऊतांनी नितेश राणेंना टोला लगावला. कोकणात नितेश राणे असताना ज्यावेळी शिवसैनिक कोकणात गेले होते. त्यावेळी नितेश राणे यांनी स्वतःला कोंडून घेतले होते, असं संजय राऊत म्हणाले.
यावेळी बोलताना संजय राऊतांनी नितेश राणेंवर आरोप देखील केलेत. नितेश राणेंच्या बोगस कंपन्या असून शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास करणाऱ्या यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये, असं खोचक सल्ला देखील संजय राऊतांनी दिला. खासदार भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव यांना ईडी आणि सीबीआयच्या नोटीस मिळाल्यानंतर यांनी लगेच एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांच्या प्रमाणेच मलाही या नोटीस आल्या मात्र मी घाबरलो नाही, असं देखील संजय राऊत म्हणाले.
