Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

४८ भारतरत्नांच्या चित्रांचे प्रजासत्ताक दिनी अनावरण !

पुणे :  पिंपळे जगताप, सणसवाडी(शिरूर) येथे असलेल्या कंपनीच्या सीमा भिंतीवर सर्व ४८ भारतरत्नांचे चेहरे स्वखर्चाने रेखाटून मधुरे इन्फ्रा इंजिनीअरिंग प्रा.लि. ने भारतरत्न प्राप्त महनीय व्यक्तींना प्रजासत्ताकदिनी अनोखी मानवंदना दिली !

ज्या कंपनीच्या सीमा भिंतीवर ही भारतरत्ने रेखाटण्यात आली आहेत तिचे नाव ‘जियांग्यीन युनी-पॉल व्हॅक्युम कास्टिंग इंडिया प्रा.लि. ‘ असे असून तिचे मुख्यालय इंग्लंड मध्ये आहे.

२६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिनी या भारतरत्न सन्मान प्राप्त व्यक्तींच्या चेहऱ्यांचे रेखाटन असलेल्या भिंतीचे अनावरण महर्षी धोंडो केशव कर्वे, पं. भीमसेन जोशी या भारतरत्नांच्याच कुटुंबीयांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता झाला.

‘ रेखाटनांचे अनावरण करण्यासाठी भारतरत्न प्राप्त व्यक्तींच्या कुटुंबीयांपैकी प्रतिनिधी म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कुटुंबातील सौ.मीना आनंद कर्वे, डॉ. प्रियदर्शिनी कर्वे, पंडित भीमसेन जोशी यांच्या कुटुंबातील सौ.लक्ष्मी जयंत जोशी, सौ.शुभदा मुळगुंद हे सदस्य उपस्थित होते. या सर्वांनी उपक्रमाचे स्वागत करणारे मनोगत व्यक्त केले. मधुरे इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रा.लि. तर्फे उमेश विठ्ठल मधुरे,सुनिता उमेश मधुरे यांनी स्वागत केले.डॉ. दीपक बीडकर यांनी सूत्रसंचालन केले.भारतरत्ने रेखाटणारे कलाकार आनंद खिरोडकर व सहकाऱ्यांचा सत्कार ‘ जियांग्यीन युनी-पॉल व्हॅक्युम कास्टिंग ‘कंपनी चे संचालक डायरेक्टर अंकीत हांडा, सौ. हांडा,मुख्याध्यापिका मंगल वाजे, स्वाती बेंडभर,प्रकल्पाचे आर्किटेक्ट मयूर वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पी.एन.सप्रे, ओमकार कुलकर्णी, अजितकुमार पाटील आदी उपस्थित होते.

पुण्यातील मधुरे इन्फ्रा इंजिनीअरिंग प्रा.लि. ही कंपनी ‘जियांग्यीन युनी-पॉल व्हॅक्युम कास्टिंग इंडिया प्रा.लि. ‘ यांना प्रकल्प उभारणीच्या सेवा पुरवते. या प्रकल्पात चार चाकी वाहनांसाठी साठी लागणारे टर्बो फॅन बनतात. ‘ जियांग्यीन युनी-पॉल व्हॅक्युम कास्टिंग इंडिया प्रा.लि. ‘ या कंपनीला मधुरे इन्फ्रा इंजिनीअरिंग प्रा.लि. ने उभारणीचे काम सुरु असताना सीमा भिंतीवर भारतरत्नांचे चेहरे रेखाटण्याची संकल्पना दिली आणि स्वखर्चाने हे काम करण्याची तयारी दाखवली. ‘ जियांग्यीन युनी-पॉल व्हॅक्युम कास्टिंग’ने त्यांना परवानगी दिल्यावर हे काम सुरु झाले. दोन कलाकारांनी ४८ भारतरत्नांचे चेहरे या भिंतीवर रेखाटले आणि त्यांची माहिती देखील लिहिली.

उमेश विठ्ठल मधुरे,सुनिता उमेश मधुरे म्हणाले,’भारताचे नाव संपूर्ण जगामध्ये उज्ज्वल करणाऱ्या काही मोजक्या महनीय व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला जातो. त्या सर्व व्यक्तींचा परिचय समाजातील सर्वांना होणे अपेक्षित आहे. या स्तुत्य विचाराने भारताचे सजग नागरिक या नात्याने व सर्व भारतरत्नांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करावा या उद्देशाने कंपनीतील शेडच्या सिमाभिंतीवर सर्व ४८ भारतरत्नांची भित्तीचित्रे हाताने रेखाटली आहेत व त्यांच्या कार्याची संक्षिप्त माहिती लिहीली आहे.

‘भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार या महान पुत्रांना त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेल्या त्यांच्या असिम त्यागाला , समर्पित वृत्तीला , निस्वार्थ भावनेला , ध्येयवेड्या आदर्शाला , त्यांच्या उत्तुंग व उल्लेखनीय कार्याला स्मरुन दिला जातो. या सर्व महान व्यक्तींच्या घरातील सदस्यांचे समर्पण , त्याग , सहन केलेल्या अवहेलना , कष्ट व त्यांची सोबत याची माहिती सर्वाना होणे गरजेची होते . कदाचित कुटुंबातील सदस्यांशिवाय यांचे कार्य तडीस गेले नसते. याच भावनेतून महर्षी कर्वे, पं. भीमसेन जोशी या दोन भारतरत्नांच्या कुटुंबियांना प्रातिनिधीक स्वरूपात निमंत्रित केले होते.परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांनाही निमंत्रित केले होते.टर्बो फॅनच्या दगडात कोरलेल्या शिल्पाचेही अनावरण करण्यात आले.

भारतरत्न प्राप्त व्यक्तींच्या कुटुंबियांचा सत्कार :

२६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम झाला.झेंडा वंदन ,प्रमुख पाहुणे यांचा आदर सत्कार, सर्व भारतरत्नांची ओळख व माहिती पुर्ण निवेदन, भारतरत्नांच्या कुटुंबियांसोबत भोजन समारंभ अशी या कार्यक्रमाची रूपरेषा होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading