Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

सनदी लेखापालांच्या एकत्रित प्रयत्नातून अर्थव्यवस्थेला चालना सीए जी. बी. मोदी यांचे प्रतिपादन

पुणे  : “एखाद्या उद्योगाची नोंदणी झाल्यावरच सनदी लेखापालाचे काम सुरू होते, ही धारणा बदलायला हवी. राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रत्येक मंत्रालयामध्ये सनदी लेखापालांना अनेक संधी खुणावत आहेत. शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सनदी लेखापालांनी घ्यावी. सनदी लेखापालांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सनदी लेखापाल जी. बी. मोदी यांनी केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटी फॉर मेम्बर्स इन प्रॅक्टिस आणि ‘आयसीएआय’ पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कार्यरत सनदी लेखापाल’ (मेम्बर्स इन प्रॅक्टिस) या विषयावरील आयोजित राष्ट्रीय परिषदेत मोदी बोलत होते.

मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात झालेल्या परिषदेवेळी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चन्द्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य सीए ऋता चितळे, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे, उपाध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, सचिव सीए प्रितेश मुनोत, खजिनदार सीए प्रणव आपटे, सदस्य सीए हृषिकेश बडवे, सीए सचिन मिनियार, सीए अजिंक्य रणदिवे आदी उपस्थित होते.

सीए जी. बी. मोदी म्हणाले, “शहरांपेक्षा ग्रामीण भागांमध्ये उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी अधिक आहेत. एमएसएमई क्षेत्राला बळ दिल्याने संपूर्ण समाज बळकट होईल. पंतप्रधान मोदींचे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न सत्यात उतरवायचे असल्यास सनदी लेखापाल महत्वाची भूमिका बजावू शकतो.”

लघु-मध्यम उद्योग यांना व्यापक व प्रगत स्वरूपातील आर्थिक पाठबळ, शासकीय योजना, विविध स्तरांवर तंत्रज्ञानाची मदत, अनुदान शहरी व ग्रामीण भागात किती टक्के मिळते याबद्दलचे मार्गदर्शन मोदी यांनी केले. तसेच उद्योजकांसाठीच्या विविध शासकीय योजनांची माहिती मोदींनी दिली.

परिसंवादाच्या उर्वरित सत्रामध्ये सीए विनीत देव यांनी ‘एमएसएमई’मधील निधी यावर, सीए राजन वोरा यांनी उद्योगांमधील वादग्रस्त करांवर, सीए दयानिवास शर्मा यांनी डिजिटल अकौंटिंगवर, सीए विवियन पिल्लई यांनी आर्थिक वर्ष संपताना घ्यावयाची काळजी यावर, ऍड. के. के. चैतन्य यांनी कायदेविषयक, तर सीए प्रमोद जैन यांनी ‘नॉन कॉर्पोरेट संस्थांच्या अकौंटिंग स्टॅण्डर्ड्स’ वर मार्गदर्शन केले.

सीए ऋता चितळे, सीए काशिनाथ पठारे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत-प्रास्ताविक सीए राजेश अग्रवाल यांनी केले. सूत्रसंचालन सीए प्रणव मंत्री यांनी केले. आभार सीए प्रितेश मुनोत यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading