Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

मुलांच्या वाचनाची आवड ओळखून बालसाहित्यनिर्मिती व्हावी : डॉ. मंगला नारळीकर


पुणे : मुलांना करमणूक हवी असते; मन लुभावणारी गोष्ट हवी असते. लेखक मंडळींनी बालसाहित्य लिहिताना आपण ते कशासाठी लिहित आहोत याचा विचार करावा, मुलांच्या वाचनाची आवड ओळखून बालसाहित्याची निर्मिती करावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ लेखिका व गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांनी व्यक्त केली. बालसाहित्य संमेलनात बाल चित्रकारांना सामावून घेतल्याने त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.

विवेक साहित्य मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नुक्कड बालसाहित्य संमेलनाचे उद्घाटन आज (दि. 8 जानेवारी) डॉ. नारळीकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. संमेलन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे, महर्षी स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, प्रसिद्ध चित्रकार रवींद्र देव, बालसाहित्यकार राजीव तांबे, विवेक समूहाचे समन्वयक महेश पोहनेरकर व्यासपीठावर होते.
डॉ. मंगला नारळीकर पुढे म्हणाल्या, बालसाहित्य लिहिताना साहित्यकाराला मुलाला काहीतरी शिकवावेसे वाटत असते त्यातून तात्पर्य निघावे असे वाटत असते, परंतु मूल कुठल्या प्रकारचे वाचन करण्यासाठी पुस्तक हातात घेते, त्याला काय हवे आहे हा भाग बालसाहित्यामध्ये आधी यायला पाहिजे. जर लेखकाला आपल्या लेखनाद्वारे काही उपदेश करायचा असल्यास अप्रत्यक्षपणे करायला हरकत नाही. वाचणाऱ्याला काय हवे आहे आणि लिहिणाऱ्याला काय सांगायचे आहे यातील संधीकाल आपल्याला मिळायला पाहिजे.

आजच्या काळातील बालकांना इंग्रजी शब्द परिचयाचे असतात, त्या दृष्टीने बालसाहित्यकाराने आपल्या साहित्यात इंग्रजी शब्दांचा वापर केल्यास मराठी भाषा संरक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना हे इंग्रजी मिश्रीत लेखन किती आवडेल या विषयी प्रश्न असल्याचे त्या म्हणाल्या. चित्रकला या विषयाला संमेलनात समाविष्ट करून घेतले आहे, याचे कौतुक करून डॉ. नारळीकर म्हणाल्या, एक चित्र हजार शब्दांचा आशय-भावना व्यक्त करू शकते.
बालसाहित्य संमेलनाची संकल्पना खूप आवडल्याचे सुरुवातीस आवजूर्न नमूद करून डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, मुलांच्या प्रत्यक्ष सहभागातून हे संमेलन होत आहे ही बाब सुद्धा छान आहे. मुलांशी संवाद साधायचे म्हटले की मला कविताच दिसायला लागते असे सांगून त्यांनी ‘झाड आजोबा’ ही कविता सादर करताना मुलांनाही त्यांच्याबरोबर कविता म्हणायला सांगितले. आपल्या नातवाने कधीतरी सूर्योदय बघावा म्हणून युक्तीने त्याच्याशी संवाद साधणाऱ्या आजी-नातवाच्या नात्यावर आधारित कविताही त्यांनी सादर केली.
डॉ. रवींद्र देव म्हणाले, बालकांमध्ये सुप्त गुण असतात ते पालकांनी ओळखून प्रोत्साहन दिले पाहिजे. यातून मुलांचे जीवन समृद्ध होत जाते. मुले लहान असली तरी त्यांची कल्पनाशक्ती मोठी असते त्यामुळे त्यांना पोषक वातावण देणे पालकांचे कर्तव्य आहे.
संमेलनाचे उद्घाटन सरस्वती पूजन आणि ग्रंथपूजनाने झाले. सुरुवातीस विवेक साहित्य मंचच्या समन्वयक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी प्रास्ताविकात नुक्कड बालसाहित्य संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. संमेलनांमध्ये लेखक-कविंचा सहभाग असतो त्याप्रमाणे चित्रकारांचा सहभाग का नसतो, असा प्रश्न एका विद्यार्थ्यांने विचारला होता. या प्रश्नावर विचार मंथन सुरू असताना संमेलनात येणाऱ्या प्रमुख व्यक्तींचा सत्कार मुलांनी साकारलेल्या चित्र आणि फुलांद्वारे करावा तसेच कथा-कविता, चित्रांच्या माध्यमातून मुलांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे यासाठी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन केले असल्याचे त्या म्हणाल्या.
महेश पोहनेरकर, डॉ. आनंद काटीकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. संगीता बर्वे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानिमित्त त्यांचा सत्कार डॉ. मंगला नारळीकर यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन सायली शिगवण हिने केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading