कोविडमुळे मृत व्यक्तींच्या कर्जमाफी संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करणार – डॉ. नीलम गोऱ्हे
नागपूर: कोविड मुळे मृत झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कुटुंबियांवरील कर्जाचे संकट दूर करण्यासंदर्भात सकारात्मक दृष्टीने सहकार विभागाशी प्राथमिक चर्चा झाली आहे. लवकरच राज्य आणि केंद्र सरकारकडे याचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
राज्यात २०२० ते २०२१ दरम्यान कोविड आजारामुळे ज्या व्यक्ती मृत झाल्या आहेत, त्यांची शेती कर्जापोटी जिल्हा सहकारी बँकेत, पतसंस्थेत तसेच इतर बँकेत गहाण असून त्यांचे कुटुंबिय आर्थिक संकटात आहे. त्यांना शासन स्तरावर दिलासा देण्यासाठी आज विधानभवनात डॉ. गोरे यांनी सहकार विभागासोबत बैठक घेतली.
या बैठकीमध्ये, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मृत कर्जदाराचे राहते घर, इतर मालमत्ता, तारण असल्यास त्याच्या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेत त्यावर उपाय काढण्यासाठी चर्चा झाली. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक, नागरी सहकारी बँक, पतसंस्था यांसह राष्ट्रीय बँकेत थकीत कर्ज असतांना व कोरोनामुळे मृत झालेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी प्रयत्न करावे. ही मदत कशी करावी, त्याचे निकष काय असावे, त्याबाबत सूक्ष्म नियोजन करून अहवाल सादर करण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.
यामध्ये बँका व इतरकडून महिलांना होणारा त्रास कमी होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व बँक व संस्था यांना सूचना निर्गमित कराव्यात व या महिलांना कोणत्या प्रकारे मदत करता येईल याबाबत अभ्यास करावा व तसा प्रस्ताव सादर करावा अशाही सूचना डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
या बैठकीला सहकार आयुक्त अनिल कवडे, उपसभापती यांचे खाजगी सचिव रवींद्र खेबुडकर, विशेष कार्यकारी अधिकारी अविनाश रणखांब उपस्थित होते.