शरद पवारांचा बोम्मईंना 48 तासांचा अल्टीमेटम
मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सीमावादावरून आधीच राजकारण तापलेलं असताना बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना थेट इशारा दिला आहे.
पुढच्या 24 तासात हल्ले थांबले नाहीत तर आमच्या संयमाला वेगळं वळण लागेल. याची जबाबदारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची असेल. 48 तासात परिस्थिती सुधारली नाही तर माझ्यासह सर्वजण कर्नाटकतात जातील, असा अल्टीमेटमच शरद पवार यांनी यांनी दिला आहे.
बोम्मईच्या वक्तव्यांमुळे सीमाभागातली परिस्थीती गंभीर झाली आहे. बेळगावमध्ये जे घडलं ते निषेधार्ह आहे. बाबासाहेबांच्या स्मरणाच्या दिवशी सीमेवर घडलेला हा प्रकार निषेधार्ह असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन काहीच फायदा झाला नाही. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंमुळे परिस्थिती चिघळल्याचं पवार यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे.
महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला आहे. अशा हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान परिस्थिती आणखी चिघळली जाण्याची शक्यता आहे.
