सुवर्णभूमी भारताची प्रतिमा उंचावणे हीच भारतीयांची सफलता – ह.भ.प. ज्ञानेश्वरबुवा कपलाने
पुणे : स्वातंत्र्यपूर्व काळात प्राणार्पण सुद्धा करून रणधुरंधरांनी आणि क्रांतिकारकांनी आपले जीवन सफल केले. आज स्वातंत्र्योत्तर काळात ‘परम वैभवम् नेतुम् एतद् राष्ट्रम् भारताची ज्ञानभूमी, तपोभूमी, सुवर्णभूमी अशी प्रतिमा उंचावणे यातच भारतीयांची सफलता आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. ज्ञानेश्वरबुवा कपलाने यांनी केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने ‘पुणे कीर्तन महोत्सव २०२२-कथा रणधुरंधरांच्या’ चे आयोजन कसबा पेठेतील लाल महालात करण्यात आले आहे. यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वरबुवा कपलाने यांचे कीर्तन झाले. यावेळी साधकाश्रम आळंदीचे ह.भ.प.चिदंबरेश्वर महाराज साखरे, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, सेवा मित्र मंडळचे शिरीष मोहिते, सागर कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
ह.भ.प .ज्ञानेश्वरबुवा कपलाने म्हणाले, आज आपण आत्मकेंद्रीत, संकुचित होत चाललो आहोत. माझ्या पलीकडे मी किती व्यापक भूमिकेत जगतो, किती जणांना मी आनंद दिला आहे, किती जणांसाठी मी उपयुक्त ठरलो आहे, किती जणांना माझे जीवन मार्गदर्शक ठरले आहे. यावर आपल्या जीवनाची सफलता अवलंबून आहे.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने गुरुकुल शिक्षणपद्धतीने पोवड्याचे शिक्षण देता यावे यासाठी कसबा पेठेत शाहिरी भवन करण्याच्या कामास सुरूवात झाली आहे. यासाठी १६ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. लोककलेला जगविण्यासाठी दानशुरांनी देणगी द्यावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
उदय शहापूरकर (हार्मोनियम) होनराज मावळे (तबला) साथ संगत केली. दिनांक ५ डिसेंबर रोजी दररोज सायंकाळी ६ वाजता कीर्तन होणार आहे. अक्षदा ईनामदार यांनी सूत्रसंचालन केले. अरुणकुमार बाभुळगावकर यांनी आभार मानले.
