Wednesday, August 26, 2026
Latest NewsPUNE

मूर्ती फाउंडेशन कडून भांडारकर संस्थेमध्ये संशोधकांसाठी भव्य संकुलाचे भूमिपूजन संपन्न

पुणे: आपल्या देशाची संस्कृती आणि भाषा हा चिरंतन राहणारा ठेवा आहे. या ठेव्याची जपणूक करण्याबरोबरच हा ठेवा पुढील पिढीकडे नेणे महत्वाचे आहे त्यासाठी समाजाने उदारहस्ते दान देण्याची मानसिकता ठेवायला हवी, अशी अपेक्षा मूर्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती सुधा मूर्ती यांनी आज येथे बोलताना व्यक्त केली आहे .
मूर्ती फाउंडेशनच्या वतीने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या परिसरात उभारण्यात येणार्‍या दोन मजली अद्ययावत विद्यासंकुलाच्या वास्तूचे भूमिपूजन श्रीमती सुधा मूर्ती यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि उद्योगपती अभय फिरोदिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर पुणे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, संस्थेचे अध्यक्ष सदानंद फडके, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव सुधीर वैशंपायन उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध ७ पुस्तकांचे प्रकाशन देखील करण्यात आले. शहर अभियंता प्रशांत वाघमारे, कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे, अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, वास्तुविशारद संजय भट, हेमंत महाजन, डेक्कन कॉलेजचे प्र- कुलगुरू श्री प्रसाद जोशी यांना श्री. फिरोदिया यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
श्रीमती मूर्ती पुढे म्हणाल्या की, आपली संस्कृती, भाषा, मूल्य यांची जपणूक करीत असताना ती पुढील पिढीपर्यत पोचणे तितकेच महत्वाचे आहे. त्याबद्दल अभिमान असायला हवा. पैसा हा जीवनातील अत्यावश्यक असा घटक आहे, त्याबाबत दुमत असू शकत नाही. पण त्याला मर्यादा आहेत तो कायमस्वरूपी टिकणारा नाही. त्यामुळे आपल्याकडील काही प्रमाणातील पैसा हा भाषा , संस्कृतीच्या विकासासाठी दान देण्याची मानसिकता असायला हवी. कारण त्यामधून मिळणारा आनंद, समाधान भावना हे न मोजता येण्यासारखे आहे. कारण यामुळे संस्कृती जतन करण्यास हातभार लागणार आहे. आज संस्कृत भाषेबाबत समाजात फारशी जागरूकता, उत्सुकता दिसत नाही. त्यामुळे ही भाषा शिकणार्‍याना मदत करण्याची भूमिका असायला हवी. भांडारकर संस्था जे काम करीत आहे ते नक्कीच आदर्श असे आहे त्याचा नक्कीच अभिमान आहे, असेही त्या म्हणाल्या.
श्री. फिरोदिया यांनी सांगितले की, नवीन पिढीतील अभ्यासकांना संशोधन आणि अभ्यासासाठी अद्ययावत अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. त्याचप्रमाणे परिसरातील भव्य ग्रंथालयात अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. ज्यायोगे या संस्थेशी मोठ्या प्रमाणावर युवा पिढी जोडण्यास मदत होणार आहे. संस्थेसाठी सरकारकडून किती प्रमाणात अर्थसाहाय्य मिळेल यापेक्षा संस्था स्वयंपूर्ण कशी होईल यावर आमचा भर असणार आहे. त्यासाठी उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधले जात आहेत. यावेळी त्यांनी संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा आणि आगामी योजनांची माहिती सांगितली.

संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री. पटवर्धन यांनी स्वागत करून प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शहर अभियंता श्री. वाघमारे यांनी संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. मानद सचिव श्री. वैशंपायन यांनी आभार मानले तर संस्थेचे निबंधक डॉ. श्रीनंद बापट यांनी सूत्रसंचालन केले. संस्था अध्यक्ष श्री. सदानंद फडके यांनी समारोप केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading