उदयनराजे यांना माझी विनंती आहे की हा विषय आता कुठेतरी संपवावा लागेल-चंद्रकांत पाटील
पुणे:महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद शमण्याचे नाव घेत नाही.शिवाजी महाराजांचा अवमान केल्याच्या मुद्द्यावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. विविध राजकीय पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचे पालन करतात. अशा स्थितीत विविध अवमानकारक विधाने करून त्यांचा अपमान होत असताना या राजकीय पक्षांना राग का येत नाही? या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे, असे ते म्हणाले.
माझी राजेंना हात जोडून विनंती आहे. ज्या राज्यपालांनी शिवनेरी किल्ल्यावर पायी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. त्यांच्याकडून बोलण्यामध्ये एखादी गोष्ट चुकीची झाली असेल. त्यांना माझी विनंती आहे की हा विषय आता कुठेतरी संपवावा लागेल.असे भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंना विनंती केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. आमच्यासाठी ते आदरणीय आहेत. ‘श्रीमंत छत्रपती उदयनराजे’ याच्याशिवाय त्यांचा उल्लेख करणे बरोबर नाही. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूरसह जत तालुक्यातील काही गावांवर दावा सांगितल्यामुळे सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच तापला आहे.राज्यातील राजकारण देखील चांगलंच देखील ढवळून निघालं आहे. आता याचदरम्यान,कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये गर्भित इशारा दिला आहे.पाटील म्हणाले, आम्हांला कर्नाटकमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं वक्तव्य केल्यानं सीमावाद पुन्हा तापणार असल्याची चिन्हं आहेत.
अजित पवार यांनी सरकार जाणार याबाबत केलेल्या विधानावर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अजित पवार हे भविष्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना सरकार जाणार हे कळल्यामुळे घाईघाईने पुणे जिल्ह्याच्या नियोजनामध्ये निम्या पैशांच्या प्रशासकीय मान्यता देऊन टाकल्या. कारण त्यांना भविष्य कळतं. आधी सरकार जाणार की राज्यपाल हे त्यांना कळतं,असा खोचक टोला देखील पाटीलांनी अजित पवारांना लगावला. शिवाय उद्धव ठाकरेंच्या महिला मुख्यमंत्र्याच्या वक्तव्यावर बोलण मात्र त्यांनी टाळलं.