Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

संचित झिरपत झिरपत कविता पृथ्वीवर येते… : सौमित्र

डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये अभिनेते कवी किशोर कदम यांच्याशी हळवा संवाद

पुणे : ‘कविता, गझल, गीत ही त्या क्षणापुरती घटना नसते.जन्मा जन्माचं, वर्षानुवर्षाचं संचित झिरपत झिरपत येते, आणि कविता पृथ्वीवर येते… असा कवितेचा हळवा प्रवास किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी रविवारी दुपारी उलगडला.

निमित्त होते डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलमधील किशोर कदम उर्फ कवी सौमित्र यांच्या मुलाखतीचं. सुरेशकुमार वैराळकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या संवाद कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

किशोर कदम म्हणाले, ‘कवीला लेखन करताना उदास व्हावं लागतं, बैठक जमवावी लागते, असे काही नाही. अनेक गीते परिस्थितीच्या, अल्बमच्या, संगीतकाराच्या पाठपुराव्यामुळे जन्माला येतात. ‘ झाडाखाली बसलेले ‘ अशी कवितांची उदाहरणे त्यांनी दिली.

कवितेचा प्रवास सांगताना ते म्हणाले, ‘ लहानपणी मी नकोसा वाटणारा मुलगा होतो. यमक छंदापासून सुरवात झाली. स्वतःच लिहिलेली कविता स्वतःलाच ऐकवत गेलो. अरूण म्हात्रेनी मला प्रथम कविता वाचनाला बोलावले. ते पहिले सादरीकरण ठरले.’गारवा ‘ कवितेला २२ वर्ष झाली. खूप लोकप्रिय झाली. आणि पुढचा प्रवास सुरू झाला.

गीतकाराला गीत मागितल्यावर ते लगेच सापडत नाही, पण अचानक कसे सापडते , याचे किस्से त्यांनी सांगितले. स्वतःसाठी लिहिलेल्या ‘ दिस चार झाले मन ‘ कवितेची उदाहरणे त्यांनी सांगीतली. ते म्हणाले, ‘कवितेतलं माझं व्यक्तीत्व बाजूला काढायचाही प्रयत्न केला. पुढेही जायचा प्रयत्न केला. आणि अभिनयाचा प्रवास सुरू झाला.

अभिनय सत्यदेव दुबेंकडे १६ वर्ष शिकत गेलो. एक पैसा न घेता मला भरभरून शिकवलं. पुढे गेल्यावर मुळं न विसरण्याचं शिक्षण त्यांनी दिलं.कामाची मजा घेत घेत मी काम करत गेलो. पाच- सहा वेळा हुलकावणी दिलेला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

‘ बघ माझी आठवण येते का ? ‘ अशा कविताही फर्माईशीदाखल त्यांनी सादर केल्या. रसिकांनी अर्थातच भरभरून दाद दिली. जयराम कुलकर्णी यांनी स्वागत केले. आरजे तरूण यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading