लोकप्रतिनिधींनी जनतेला असेच गृहीत धरले तर स्वराज्य इथल्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या मुलांना निवडून आणेल : छत्रपती संभाजीराजेंचा इशारा
परभणी : छत्रपती संभाजीराजे हे आज ( दि. १९ ) परभणी जिल्हा दौऱ्यावर असताना पूर्णा येथे उस्फूर्तपणे जमलेल्या विराट सभेला संबोधित केले. यावेळी आज दिवसभरात दौऱ्याच्या माध्यमातून जे प्रेम येथील जनतेने स्वराज्याला दिले, ते पाहता या जनतेप्रती स्वराज्याची जबाबदारी देखील वाढलेली आहे, असे प्रतिपादन संभाजीराजे यांनी केले.
पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले की, इथल्या पुढाऱ्यांनी नेहमी प्रलोभने देऊन परभणीच्या जनतेची फसवणूक केली. या भागाच्या विकासाची, इथल्या तरुणांच्या भवितव्याची पर्वा कोणत्याच पुढाऱ्याला नाही. केवळ निवडणुकीपुरते गावात यायचे आणि नंतर ढुंकूनही बघायाचे नाही, ही हीन मनोवृत्ती आता स्वराज्य मोडून काढेल. इथल्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या उमद्या मुलांना ताकद देऊन स्वराज्य परभणीत निश्चितच परिवर्तन घडवेल.
यावेळी सभेला स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह पूर्णा पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, स्वराज्य संकल्प अभियान अंतर्गत परभणी जिल्हा दौऱ्यात पूर्णा येथे झालेल्या छत्रपती संभाजीराजे यांच्या विराट सभेत भगतसिंह कोष्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे, असा ठराव करण्यात आला.
