गुजरातमध्ये निवडणुका होत आहेत त्यामुळं महाराष्ट्रातील प्रकल्प तिथे जात आहेत -राहुल गांधी
नांदेड : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नोटाबंदी, जीएसटी आणि प्रकल्पांचे स्थलांतरण या मुद्यावरुन केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे.तुमचे प्रकल्प गुजरातला जात आहेत. कारण, गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळं महाराष्ट्रातील प्रकल्प तिथे नेले जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले. एअरबस आणि फॉक्सकॉन हे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले आहेत. याच मुद्यावरुन राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आज त्यांची नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, ज्या दिवशी नोटबंदी झाली. ज्या दिवशी चुकीचा जीएसटी लागू झाला त्या दिवशी भारतावर आर्थिक सुनामी आल्याचे गांधी म्हणाले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मी काळ्या पैशाविरुद्ध लढाई लढत आहे. आता पाच सहा वर्षे झाली. या वर्षांमध्ये काय झालं ते तुमच्यासमोर असल्याचे गांधी म्हणाले. काळा पैसा संपला का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
केंद्र सरकारने महाराष्ट्रातून मोबाईल फोनचा प्रकल्प काढून घेतल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. मोबाईल फोन प्रोजेक्ट, फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट, कुठे गेला? असे गांधी म्हणाले. तरुणांचे भविष्य, त्यांचा रोजगार तुमच्या राज्यातून हिसकावला जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले. शेतकरी आणि मजुरांचा भारत समजून घ्यायचा असेल तर वाहनाने प्रवास करुन समजणार नाही. भारत समजून घ्यायचा असेल तर तो रसत्यावरुन चालून समजेल, विमान, हेलिकॉप्टर किंवा वाहनांनी फिरुन समजणार नाही. असेही राहुल गांधी म्हणाले.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष मलिकाजुन खरगे, व विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले,कापशी फाटा ते नांदेड पदयात्रेला आज सकाळी तुफान प्रतिसाद मिळला. देशा – परदेशातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य जनता यात्रेत उत्स्फुर्तपणे सहभागी झाली होती. दरम्यान, ‘भारत जोडो’ यात्रा ही देशाला खऱ्या अर्थाने एकत्र जोडणारी, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.
राहुल गांधी असा चर्चांदरम्यान अनेक गोष्टींबद्दल माहिती देतात असं त्यांच्याबरोबर या यात्रेमध्ये सुरुवातीपासून चालत असलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. मध्यंतरी त्यांनी लिंगायत समाज कपाळावर लावतात त्या विभूतीचं महत्त्व पटवून सांगितलं होतं. स्वामी विवेकानंदांचे सुविचार ते विचारही राहुल गांधी अनेक उदाहरणांमध्ये सांगतात असंही या कार्यकर्त्यांनी सांगितलं. राहुल गांधी यांच्याशी होणाऱ्या संवादातून विविधांगी माहिती मिळत असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.
