‘ये रिश्ता क्या केहेलाता है’ फेम अभिनेत्री वैशाली ठक्करची आत्महत्या
मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘ये रिश्ता क्या केहेलाता है’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्करने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेत्रीने आपल्या इंदोरच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्कर गेल्या एक वर्षांपासून इंदोरमध्ये राहात होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येची माहिती समोर येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांना वैशालीच्या मृतदेहा शेजारी सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजाजी नगर परिसरातील पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. अद्याप अभिनेत्रीच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाहीय. परंतु पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असल्याने लवकरच या घटनेचा उलघडा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.वैशाली ठक्करने इंदोरमधील स्वत: च्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने सेलेब्रेटींसह तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
वैशाली ठक्करने २०१५ मध्ये ‘ये रिश्ता क्या केहेलाता है’या लोकप्रिय मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेत तिने संजना ही भूमिका साकारली होती. पहिल्याच मालिकेतून वैशालीला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेनंतर ती लगेचच ‘ये है आशिकी’ या कलर्स वाहिनीवरील मालिकेत दिसली होती.
त्यांनतर वैशाली ठक्करने कलर्स वाहिनीवरील ‘ससुराल सिमर का’ मालिकेत काम केलं होतं. यामध्ये तिने सिमर अर्थातच दीपिका कक्करच्या लेकीची अंजलीची भूमिका साकारली होती. तसेच वैशालीने लाल इश्क, सुपर सिस्टर, मनमोहिनी सीजन २ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. वैशालीने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात अँकरिंगपासून केली होती. वैशाली ही मूळची मध्य प्रदेशातील उज्जैनची आहे.
