Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

जर आम्ही बेईमानी केली असती तर एवढे लोकं सोबत आले असते का? – एकनाथ शिंदे

मुंबई : एवढा विराट जनसमुदाय येथे जमलाय. काही जण तर काल रात्रीच आले, पहाटेच आले. आपण पाचची वेळ दिली होती. पण त्याआधीच शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी येथे दाखल झाले. मी तुमच्यासमोर डोकं टेकलं, कारण मी आज मुख्यमंत्री असलो तरी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. आम्ही जी हिंदुत्व रक्षणाची बाळसाहेबांची भूमिका घेतली आहे, त्याला या विराट जनसमुदायाचा पाठिंबा आहे.

हजारो शिवसैनिकांनी आपलं रक्त सांडल – खरी शिवसेना कुठंय या प्रश्नाचं उत्तर या जनसमुदायाच्या महासागरानं आज दिलंय. मी राज्याचा मुख्यमंत्री आहे, पण मी ठरवलं होतं की, मैदान देण्यामागे आपण हस्तक्षेप करायचा नाही. तुम्हाला खरं सांगतो, सदा सरवणकरांनी आधी अर्ज दिला होता. पण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाच्या विचारांना मूठमाती तुम्ही दिली. त्यांच्या विचारांना तिलांजली दिली. आणि मग सांगा, तुम्हाला त्या जागेवर उभं राहण्याचा नैतिक अधिकार तरी उरलाय का? बोलण्याचा अधिकार तरी उरलाय का? हजारो शिवसैनिकांनी आपलं रक्त सांडून जो पक्ष उभा केला तो तुम्ही तुमच्या वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकउे गहाण टाकली असा घणाघात केला आहे.बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे – बाळासाहेब रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे, तुम्ही तर पक्षाचा रिमोट होऊन राष्ट्रवादीकडे गहाण टाकला. बाळासाहेब ज्यांचा हरामखोर म्हणून उल्लेख करायचे, त्यांच्या दावणीलाच तुम्ही शिवसेना बांधली. म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी, हिंदुत्व वाचवण्यासाठी ही भूमिका आम्ही घेतली. गेली तीन महिने मी राज्यभरात फिरतोय, आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. लहान-थोर, ज्येष्ठ श्रेष्ठ आम्हाला पाठिंबा देतोय. जर आम्ही बेईमानी केली असती तर एवढे लोकं सोबत आले असते का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. ही शिवसेन ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे असही ठणकावून त्यांनी सांगितले आहे.

आम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करून शिवसेना प्रमुखांचा विचार सोडला नाही आणि सोडणारही नाही. आम्हाला सत्ता नाही तर सत्य आणि सत्त्व महत्त्वाचं आहे. तुम्ही आम्ही सर्व बाळासाहेबांचे सच्च शिवसैनिक, खरे वारसदार आहोत. बाळासाहेबांचा खरा वारसदार हा जनसमुदाय आहे. वारसा हा विचारांचा असतो. आम्ही तो जिवापाड जपलाय. त्यामुळे विचारांचे पाईक आणि शिलेदार कोण आहेत हे महाराष्ट्राला समजलंय. गद्दार आणि खोके यांना तिसराच शब्दच नाही. बाकी काही हे बोलणार नाहीत. कारण बोलण्यासारखं काहीच नाही. गद्दारी झाली हे खरं आहे, पण गद्दारी झाली ती 2019ला झाली. यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी, हिंदुत्वाच्या विचारांशी गद्दारी केली. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, त्या लोकांशी गद्दारी झाली.महाराष्ट्रातली जनतादेखील तुम्हाला क्षमा करणार नाही 

40-40 वर्षे ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या ते खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख होते ते मंत्री झाले. त्यांनी लाठ्या खाल्ल्या, केसेस घेतल्या, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. त्यांना तुम्ही गद्दार म्हणता. बाळासाहेब आमचे दैवत आहेत. त्या देवाचा अंश म्हणून आम्ही तुम्हाला पाहत होतो. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व तुम्ही गुंडाळून टाकले तेव्हा आम्हाला भूमिका घ्यावी लागायची. कशाचे खोके? यांना इतर कुणाला भेटता येत नव्हते. मीच भेटायचो, ते सांगायचे, आज आमच्याकडे अमका आला, राष्ट्रवादीचा आला. मी त्यांना सांगायचो, थोडे थांबा. आपल्याला चूक सुधारावी लागेल. त्या पराभूत झालेल्या आमदाराला ते बळ देत होते, कसे आम्ही निवडून येणार? मग त्यांनी आम्हाला टोकाचे, निर्वाणीचे जेव्हा सांगितले, तेव्हा आम्ही हा उठाव केला. तुम्हाला 40 आमदार, 12 खासदार, 14 राज्यांतील प्रमुखांनी, लाखो शिवसैनिकांनी का सोडलं? याचं तुम्ही गद्दार गद्दार टाहो फोडण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

आज तुम्ही सांगता की, भाजप बरोबर जायचं होतं, तर राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा, पण 2019 मध्ये तुम्ही राजीनामेच दिले होते का? मुख्यमंत्री असताना तुम्ही किती वेळा मंत्रालयात गेलात? अडीच वर्षांत फक्त अडीच तास? कोविड कोविड म्हणून घरात बसलात. सगळ्यांना घरी बसवलंत. बाळासाहेबांचा उल्लेख हिंदुहृदय सम्राट करतानाही तुमची जीभ कचरू लागली, मग सांगा विचारांची कास कुणी सोडली. सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लागला यातच तुमची खुशी होती. सेनेचा झेंडा आणि राष्ट्रवादीचा अजेंडा त्या ठिकाणी सुरू होता असा जाही आरोपही त्यांनी केला आहे.

या देशाच्या उभारणीत आरएसएसचं मोठं योगदान आहे. प्रत्येक आपत्तीत संघाने केलेलं काम तुम्ही पाहिलेलं आहे. प्रत्येक वेळी संघ पुढे असतो. तुम्ही पीएफआय आणि आरएसएसची तुलना करताय, थोडी तरी मनाची नाही तर जनाची वाटली पाहिजे असही त्यांनी म्हटले आहेत.संजय जेवढे सांगेल तेवढेच हे ऐकत होते – बाळासाहेब आणि पवारांची दोस्ती होती, पण राजकारणात बाळासाहेबांनी दोस्ती येऊ दिली नाही. आपल्या अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी सांगिलतंय. 2019 मध्ये आपल्या नैसर्गिक मित्राला सोडून तुम्ही राष्ट्रवादीच्या गळ्यात गळा घातला, आमचीही फरपट केलीत. मुख्यमंत्री शिवसेनेचा, पण शिवसेना संपवण्याचं काम सुरू होतं. आघाडीतील पक्ष आघाडी धर्म पाळत नव्हते. धृतराष्ट्राची भूमिका घेऊन संजय जेवढे सांगेल तेवढेच हे ऐकत होते. 

रामदास कदम म्हणाले की, आजचा हा जनसमुदाय पाहिल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय की, सर्व जण एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आहेत. मला उद्धव ठाकरेंना एक प्रश्न विचारायचाय. उद्धव साहेब तुमचे बंधू बिंदुमाधव ठाकरे आज हयात नाहीत, त्यांचे चिरंजीव निहार ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यासाठी न्यायालयीन लढाई लढत आहेत. स्मिता वहिनी येथे आहेत, जयदेव ठाकरे नुकतेच येथे येऊन आशीर्वाद देऊन गेले. तुमचे चुलत बंधू राज ठाकरे तुमच्यासोबत नाहीत. तुम्हाला तुमचं कुटुंब सांभाळता येत नाही, तेव्हा हे महाराष्ट्राचं कुटुंब कसं सांभाळणार? उद्धव ठाकरेंना कोणताही कार्यकर्ता मोठा झालेला चालत नाही. एखादा कार्यकर्ता मोठा होऊ लागला की, त्याला संपवायला लागायचं. दिघे साहेबांचाही यांनी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता असा खळबळजनक खुलासाही त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading