पालीका प्रभाग फेररचने विरोधात हवेली तालुका कृती समिती न्यायालयात दाद मागणार
पुणे : २०१७ च्या जुन्या प्रभाग रचनेनुसार पालीका निवडणूक घेण्यात येणार आहे. त्याचा फटका शहराच्या सभोवतालच्या दाट लोकवस्तीच्या ३४ गावांना बसणार आहे. यामुळे गावांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळणार नाही. त्यामुळे सर्वपक्षीय हवेली तालुका नागरि कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासनाच्या या निर्णया विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे हवेली तालुका कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी सांगितले.
शहरापेक्षा या गावात लोकसंख्येची वाढ दहा पटीने अधिक झाली आहे. २०२१ मध्ये जणगणना झाली नाही.त्यामुळे जुन्या जनगणनेच्या आधारे करण्यात येणाऱ्या प्रभाग रचना अन्यायकारक आहे. शिवणे, धायरी,फुरूसुंगी सारख्या गावात प्रत्येकी पन्नास हजारांहून अधिक मतदार आहेत.तर २०११ च्या जणगणनेनुसार अवघी आठ ते दहा हजार लोकसंख्या आहे. अशीच स्थिती सर्व गावांत आहे. शहराच्या सभोवतालच्या गावात दाट लोकवस्त्यांचे जाळे पसरले आहे. राज्य सरकारने या गावात पुरेसे प्रतिनिधित्व न दिल्यास ग्रामस्थांवर अन्याय केल्यासारखे आहे.
या गावात अद्यापही प्रशासनाने मुलभूत सुविधा उपलब्ध केल्या नाहीत.त्यामुळे रस्ते, पाणी, कचरा अशा सुविधा अभावी ग्रामपंचायत काळा पेक्षा भयानक बकालीकरण प्राप्त झाले आहे. याकडे हवेली तालुका कृती समितीचे पोपटराव खेडेकर, सुभाष नाणेकर, अमर चिंधे, संतोष ताठे, मिलिंद पोकळे आदींनी लक्ष शासनाचे लक्ष वेधले आहे. राजकिय लाभ मिळवण्यासाठी शासनाने जुन्या प्रभाग रचनेचा आधार घेतला आहे. पालीका सर्वात अधिक कर या गावातुन वसुल केला जात आहे. पालिकेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न या गावातुन मिळत आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मतदार संख्या व उत्पन्न अशा दोन्ही बाबींचा विचार करून ३४ गावांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे यासाठी शासनाने गंभीर पणे विचार करावा अशी मागणी श्रीरंग चव्हाण पाटील यांनी केली आहे.
