७.८ टक्के GDP वाढ असेल तर परदेशात जाण्यास मनाई का? राज ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल
ठाणे : भारताचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा (GDP) विकासदर ७.८ टक्के असल्याचा दावा केला जात असताना नागरिकांना परदेशात प्रवास न करण्याचे आणि सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन का केले जात आहे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. या मुद्द्यावरून त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किर्गिस्तान दौऱ्यादरम्यान भारतीयांनी अनावश्यक परदेश प्रवास टाळावा, असे आवाहन केल्याचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की, देशाचा GDP विकासदर अमेरिका आणि चीनपेक्षाही अधिक असल्याचे सांगितले जाते. मग भारतीयांनी परदेशात का जाऊ नये, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सोन्याच्या खरेदीबाबतही त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. घरातील आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यावरच काटकसर सुरू केली जाते. मग देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे सांगितले जात असताना नागरिकांनी सोन्याची खरेदी का टाळावी, असे ठाकरे यांनी म्हटले.
देशातील आर्थिक परिस्थिती प्रत्यक्षात गंभीर असल्याचा दावा करत त्यांनी आगामी काळात आर्थिक अडचणी आणखी वाढू शकतात, असा इशारा दिला. आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
NEETच्या प्रश्नावर तरुणांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, आज Gen Z रस्त्यावर उतरली आहे; उद्या संपूर्ण देशातील नागरिक रस्त्यावर उतरू शकतात. ही परिस्थिती टाळ्या वाजवण्याची नसून देशाची दिशा आणि आर्थिक परिस्थिती यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
