सैनिकांना राखी पाठविणे हे परमेश्वराचे दर्शन घेण्याइतके पवित्र कार्य – डॉ.माधवी वैद्य
पुणे : देशाच्या सिमेवर सैनिक लढत असतात, म्हणून आपण सुखरुप राहू शकतो. एखाद्या मंदिरात जावून आपण परमेश्वराचे दर्शन घेतो. हे जसे पवित्र कार्य आहे, तसेच सैनिकांना राखी पाठविणे हे देखील तितकेच पवित्र कार्य आहे. सैनिकांची आठवण आपल्याला संकटकाळी होते. आज महिला देखील सैन्यात दाखल होऊन देशासाठी लढत आहेत, हे देखील मोठे काम आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ.माधवी वैद्य यांनी व्यक्त केले.
सैनिक मित्र परिवारतर्फे आणि कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या सहकार्याने बुधवार पेठेतील मंदिराच्या सभामंडपात सैनिकांना पाठविण्यात येणा-या २१ हजार राखीपूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी निवृत्त मेजर आशा शिंदे ,ज्येष्ठ अभिनेत्री वीणा फडके, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालिका सीमा कांबळे, नगरसेविका वनिता वागस्कर, विश्वेश्वर बँकेच्या व्यवस्थापक राखी कोकाटे, संपदा सहकारी बँकेच्या संचालिका प्रा.संगीता मावळे, लोकमान्य सोसायटीच्या शाखा व्यवस्थापक गायत्री चौगुले, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.प्रताप परदेशी, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, महेंद्र पिसाळ, अॅड.रजनी उकरंडे, युवराज गाडवे, राजू बलकवडे, अक्षय हलवाई, आनंद सराफ, कल्याणी सराफ आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते राखीपूजन झाले.
उज्वला सावंत, आरती भिसे, राजू बलकवडे, सारंग सराफ आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य केले. लायन्स व रोटरी क्लबच्या अनेक शाखासह, पुण्यातील ५० हून अधिक सामाजिक संस्था, संघटनांनी या उपक्रमात सहभाग घेत राख्या दिल्या आहेत.
वीणा फडके म्हणाल्या, ज्यावेळी सैनिक सैन्यदलात भरती होतात, त्याचवेळी त्यांना अदृश्य स्वरुपात राखी बांधली जाते. रक्षाबंधन हा प्रेम व आपुलकी दर्शविणारा सण असून राखी हा प्रेमाचा रेशीमधागा आहे. त्यामुळे सर्वांमधील राष्ट्रभक्ती प्रेरित करण्याकरिता असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे.
आनंद सराफ म्हणाले, सन १९९७ पासून सलग हा उपक्रम सुरु आहे. राखी पौर्णिमेनिमित्त देशाच्या सिमेवर लढणाºया जवानांसाठी सैनिक मित्र परिवारातर्फे पुणेकरांच्या १ लाखापेक्षा जास्त राख्या पाठविण्यात येणार आहेत. तसेच सैनिकांसाठी विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्र, पत्र व राख्या पाठविण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ या कार्यक्रमाने झाला असल्याचे त्यांनी सांगितले. गिरीश पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले. अॅड.प्रताप परदेशी यांनी प्रास्ताविक केले. राजू बलकवडे यांनी आभार मानले.
