‘बॉस’ला खुश करण्यासाठी महामहिमांनी चंग बांधलेला दिसतोयं – जयंत पाटील
मुंबई : “मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास पैसाच शिल्लक राहणार नाहीत,” असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. राज्यपालांच्या या वक्तव्यावर राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपालांना सुनावले आहे.
“परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून या राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन राहावे,” अशा शब्दात जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सुनावले आहे. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी अत्यंत जपून बोलण्याचा संकेत या देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसला खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी टि्वट करुन लगावला आहे.
महाराष्ट्राच्या राजधानीत पंचतारांकित व्यवस्थेत राहून महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अपमान राज्यपाल महोदय करत आहेत. महाराष्ट्रातील भाजपाला हे विधान मान्य आहे का ? असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे. राज्यपाल मराठी माणूस, महाराष्ट्राचा गौरवशाली व जाज्वल्य इतिहास यांचा वारंवार का अपमान करत आहेत ? असा खडा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
