Monday, June 22, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

कोणी पालकमंत्री देताका? या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

पुणे:राज्यात सरकार स्थापन होऊन एक महिना होत आला तरी दोनच मंत्री काम करत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही हा महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचा अपमान असून सरकारने तातडीने अधिवेशन बोलावून मंत्रिमंडळ व सर्व पालकमंत्र्यांची नियुक्ती करावी. अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
पुणे शहर व जिल्हा राज्याचे प्रमुख शैक्षणिक,औद्योगिक व राजकीय केंद्र असून पुण्याचा कारभार गेल्या १ महिन्यापासून पालकमंत्र्यांशिवाय सुरू आहे.राज्यात सध्या अतिवृष्टीचे संकट ओढावले असून या आपत्कालीन परिस्थितीत जर मंत्रीच नसतील तर या खात्यांचा कारभार कोणाच्या भरवश्यावर सुरू असा सवाल देखील या वेळी विचारण्यात आला.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,” मा. मुख्यमंत्री आणि मा.उपमुख्यमंत्री हे दोघेच काम करत असल्यामुळे अनेक बाबींकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. मागच्या एका महिन्यात राज्यातील विविध भागांमध्ये तब्बल ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठले राज्य सरकार स्थापन झाल्या नंतर एका महिन्यात इतक्या जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही बाब महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे.

“राज्यातील या सर्व आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने अधिवेशन बोलवावे व ओला दुष्काळ जाहीर करत या ८९ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत द्यावी”,अशी मागणी यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.

महाविकास आघाडी सरकार असताना १८ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन घेण्याचे ठरविले होते. मात्र सत्ताबदल झाल्यानंतर २५ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली होती. आता २५ जुलै होऊनही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तारच झालेला नाही. सरकारकडे बहुमत आहे तर अधिवेशन घ्यायला सरकारला भीती का वाटत आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तसेच राज्यात नवे सरकार आल्यानंतर जुन्या सरकारच्या योजनांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला जातोय. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या सरकारच्या काळात महाविकास आघाडी सोबत काम केले आहे. तरीही त्यांनी जुनी कामे स्थगित करण्याचा दणका लावला आहे. कोणतेही सरकार हे कायम नसते, हे दोन्ही नेत्यांनी समजून घ्यायला हवे. मविआ सरकारने पुण्यातील वढू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २६५ कोटींचा आराखडा केला होता, त्याचा निधी थांबविण्यात आला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कामासंबंधी निधी दिला होता, तोही थांबविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विचारांचे जतन करण्यासाठी काही कामे हातात घेतली होती, त्यांचे शौर्य लोकांना कळावे अशी त्यामागची भावना होती. या कामांचा निधी थांबविण्याचे काहीच कारण नव्हते. इतक्या खालच्या पातळीचे राजकारण कधीच झाले नव्हते, असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख मृणालिनी वाणी , किशोर कांबळे विक्रम जाधव , आनंद सवाने , समीर शेख , दिपक जगताप , वेणू शिंदे , शंतनू जगदाळे , नाना नलावडे , महेंन्द्र पठारे व प्रदीप गायकवाड व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading