Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

ब्राह्मण समाजाला 1948 पासून नियोजनपूर्वक टार्गेट केले जाते आहे – डॉ. सच्चिदानंद शेवडे

पुणे,,: महात्मा गांधीच्या हत्येनंतर 1948 मध्ये समस्त ब्राह्मण समाजावर झालेले अत्याचार विसरता येणार नाही, हा रक्तरंजित इतिहास पुढच्या पिढीला समजला पाहिजे. यासाठीच 1948चं अग्नितांडव हे पुस्तक वाचवतही नाही आणि सोडवतही नाही, असे झाले आहे. देशातील अशा सर्वच दबलेल्या विषयांवर आता खरा इतिहास लिहीला जातोय, त्याचा अनेक तथाकथित पुरोगाम्यांना त्रास होऊ लागला आहे, अशा परखड शब्दात ज्येष्ठ निरुपणकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी आज येथे समाचार घेतला. आम्ही सारे ब्राह्मण नियतकालिकाच्या वतीने प्रकाशित आणि रंगा दाते लिखित पुस्तकाचे प्रकाशन आज डॉ. शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. लेखक रंगा दाते, प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी, महाराष्ट्र चित्तपावन संघाचे अशोक वझे व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. शेवडे पुढे म्हणाले की, 1948 पासून ब्राह्मणांना तेंव्हापासूनच वाईट पध्दतीने टार्गेट केले जात आहे. गांधीहत्येनंतर ठरवून आणि नियोजनपूर्वक ब्राह्मणांवर विशेषत: महाराष्ट्रातील ब्राह्मणांवर अत्याचार केले गेले. लोकमान्य टिळकांना देखील काँग्रेसने कायमच दुर्लक्षित ठेवले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना तर अजूनही टिकेला सामोरे जावे लागत आहे. केवळ ब्राह्मण असल्यानेच या नेत्यांना जातीयवादी ठरवले गेले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर सातत्याने टिंगल टवाळी केली जात आहे. ब्राह्मण आणि बहुजनांमधील वाद यासाठीच सतत पेटवत ठेवला जात आहे. यासाठीच खरा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे.

या पुस्तकामागच्या निर्मितीमागची भूमिका विषद करतांना प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी म्हणाले की, काश्मिर फाईल्स चित्रपटामुळे ज्यापध्दतीने नव्या पिढीला खरा इतिहास कळला, त्याचप्रमाणे फाळणी आणि गांधीहत्येनंतर झालेली हिंसा आणि ब्राह्मणांवर झालेले अत्याचार हे या पुस्तकामुळे कळू शकतील. ज्या भ्रष्ट राजकारणाचे हे बळी आहेत त्याचा परामर्ष घेतला गेला पाहिजे. ब्राह्मण समाजाने आजवर खूप सोसले आहे, ब्राह्मण समाजावर गलिच्छ टिंगल टवाळी सातत्याने सुरुच आहे. 1948 चा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे, त्यासाठी हे पुस्तक सर्वांनी वाचले पाहिजे.

1948 मध्ये ब्राह्मण समाजावर झालेल्या अत्याचाराची सल अजूनही खोलवर आहे, असे सांगून लेखक रंगा दाते म्हणाले की, हे पुस्तक पूर्णपणे खर्‍या इतिहासावर आधारीत आणि अनुभवांवर आधारीत आहे. प्रामुख्याने पश्‍चिम महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाची घरेदारे जाळली गेली, महिलांवर अत्याचार केले गेले, अनेकांना बेघर केले गेले. याची दाहकता पिढ्यान पिढ्या मनात बोचत राहिली आहे. ब्राह्मण समाजाच्या झालेल्या या भयंकर नुकसानीची भरपाई सरकारने आता तरी केली पाहिजे. त्याला वाचा फोडण्याचे काम या पुस्तकाने केले आहे. ब्राह्मण समाजाने तर सर्वच समाजाच्या उद्धारासाठी कायम काम केले आहे, याचाही विचार केला गेला पाहिजे.

यावेळी बोलतांना श्री. वझे यांनी ब्राह्मण समाजाने संघटीत होऊन आपल्यातील समस्यांवर काम केले पाहिजे. ब्राह्मण तरुणांनी पुढे आले पाहिजे. अजय दाते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading