fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

ढोल -ताशा हे पुण्याच्या गणेशोत्सवातील आकर्षण – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे : ढोल-ताशा वादनादरम्यान वादक तल्लीन होऊन वादन करीत असतात. त्यावेळी त्यांच्या चेह-यावरील हावभाव व आनंद पाहण्यासारखा असतो. पुण्यामध्ये ढोल-ताशा पथकांतील वादकसंख्या २५ हजारांहून अधिक असून विविध वयोगटांचे वादक आहेत. त्यामुळे ढोल-ताशा हे पुण्याच्या गणेशोत्सवातील आकर्षक असल्याचे मत पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले.

ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र तर्फे एकत्रित वाद्यपूजनाचा कार्यक्रम बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते वाद्य व ध्वज पूजन झाले. कार्यक्रमाला तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, भाऊ रंगारी मंडळाचे पुनीत बालन, बाळासाहेब मारणे, नितीन पंडित, विवेक खटावकर, रविंद्र माळवदकर, दत्ता सागरे, धीरज घाटे, डॉ.मिलिंद भोई, आनंद सराफ, सुरेश पवार, ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रचे अध्यक्ष पराग ठाकूर आदी उपस्थित होते. यावर्षी प्रथमच पोलीस आयुक्तांच्या हस्ते वाद्यपूजन झाले.

अमिताभ गुप्ता म्हणाले, इतरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याप्रमाणे आपण वादन करणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारच्या निर्बंधांवर आम्ही लक्ष केंद्रीत केले नसून उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होण्याकडे लक्ष देणार आहोत. पोलिसांकडून देण्यात येणा-या परवानग्या सुलभ पद्धतीने देता येतील, हे देखील पाहिजे जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पराग ठाकूर म्हणाले, पोलिसांकडून दिलेल्या सूचना अनेकदा स्थानिक पोलीस स्टेशन किंवा चौक्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्या सूचना त्यांच्यापर्यंत योग्यरितीने व वेळेत गेल्यास गणेशोत्सव मंडळे व ढोल-ताशा पथकांना सोयीचे होईल. आजपर्यंत दोन ते अडीच कोटी रुपयांची मदत सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पथकांनी केली आहे. कोविडमुळे दोन वर्षे गणेशोत्सवातील मिरवणुका झाल्या नाहीत. यंदा त्या मिरवणुका आणि गणेशोत्सव जोरात व सवाद्य निघाव्या. पथकांनी वादनामध्ये नाविन्य आणणे देखील गरजेचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रचे अमर भालेराव, अनुप साठये, केतन देशपांडे, संजय सातपुते, ओंकार कळढोणकर, प्रकाश राऊत, अतुल बेहेरे, आशुतोष देशपांडे, विलास शिगवण, अ‍ॅड.शिरीष थिटे, अक्षय बलकवडे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले. पुनीत बालन यांनी मनोगत व्यक्त केले. संजय सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. नितीन पंडित यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading