बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांसाठी हक्काची बँक राहणार : आशीष पांडे
पुणे : जुन्या व नवीन ग्राहकांवरच बँकेचा व्यवसाय अवलंबून आहे. बँकेने राबविलेल्या चांगल्या योजना आणि प्रामाणिक ग्राहक यामुळेच बँकेचा एनपीए (थकीत खाते) देखील कमी झाला आहे. डिजिटल बँकिंग क्षेत्रात देखील बँकेने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आगामी काळात देखील बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांसाठी हक्काची बँक राहणार आहे, असा विश्वास बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आशीष पांडे यांनी व्यक्त केला.
बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने बँकेच्या नूतन ग्राहकांसाठी “ग्राहक संपर्क अभियान” उपक्रमाचे आयोजन फातिमा नगर येथील केदारी गार्डन येथे करण्यात आले होते. या उपक्रमाला बँकेचे सुमारे १५० पेक्षा जास्त ग्राहकांनी भेट दिली. यावेळी सुमारे ८० कोटी रुपयांचे मंजूर कर्ज प्रस्तावांचे वितरण आशीष पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बँकेचे विभाग व्यवस्थापक अभिजित चंदा, कार्यकारी सरव्यवस्थापक पी. आर. खटावकर, ऋण विभागाचे सरव्यवस्थापक अमितकुमार शर्मा, उप महाव्यवस्थापक गिरीश थोरात, उपविभाग व्यवस्थापक संदीप पोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखापाल महेश अवताडे, उपमुख्य लेखापाल अभिजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवांगी राय – खरे यांनी केले. प्रस्तावना विभागीय व्यवस्थापक अभिजित चंदा यांनी तर आभारप्रदर्शन उपविभागीय व्यवस्थापक संदीप पोटे यांनी केले.
तीन मिनिटात बँक अकाऊंटची ऑनलाईन केवायसी
सातत्याने विकसीत होणाऱ्या तंत्रज्ञानात बँक ऑफ महाराष्ट्र देखील आघाडीवर आहे. दर सात वर्षांनी करावी लागणारी खात्याची केवायसी ही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केवळ ३ मिनिटात करण्याची सुविधा बँकेच्या वतीने उपलब्ध करून दिल्याचे आशीष पांडे यांनी सांगितले. या सुविधेमुळे ग्राहकांच्या वेळेची बचत होणार असल्याने जास्तीत जास्त ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन पांडे यांनी यावेळी केले.
बँकेसाठी क्रेडिट स्कोअर हा नेहमी महत्त्वाचा
कोरोनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेकांचे क्रेडिट स्कोअर कमी झाले आहेत. त्यांनी देखील आपला क्रेडिट स्कोअर maintain ठेवावा, जेणेकरून बँकेचा देखील आपल्यावरील विश्वास कायम राहू शकेल, त्यामुळे भविष्यात देखील बँक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू शकेल, असा सल्ला आशिष पांडे यांनी ग्राहकांना दिला.