अभंग व भजन स्पर्धेच्या माध्यमातून कैद्यांचे विचार परावर्तित करण्याचा प्रयत्न आहे – अजित पवार
मुंबई – केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त होण्यासाठी कैद्यांना चांगली पुस्तक वाचून त्यांचे विचार परावर्तित करण्याचा प्रयत्न आहे. यातून गुन्ह्यांची संख्याही कमी होण्याचा प्रयत्न होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. भागवत धर्माची पताका ही समाजाला नेहमी एकरून आणि एकसंघ ठेवण्याची प्रेरणा देते, असेही त्यांनी नमूद केले.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदिजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रबोधन रथ तयार करण्यात आला असून तो संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे. या प्रबोधन रथास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भागवत धर्माची पताका दाखऊन मार्गस्थ केला. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रमुख उपस्थितीती होती. मुंबई येथील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आज हा कार्यक्रम झाला.
लक्ष्मीकांत खाबिया हे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करत असतात. हा कार्यक्रम आगळावेगळा आहे. राज्यातील जेलमध्ये कैद्याला शिक्षा भोगत असताना त्यांच्यात बदल करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे असेही अजित पवार म्हणाले.
राज्यातील २७ कारागृहांमध्ये शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी जाऊन ही स्पर्धा घेणार आहेत. विविध कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कलागुणांना अध्यात्म व भजनातून वाव मिळावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत मोहनलाल खाबिया यांनी या उपक्रमातून पुढाकार घेतल्याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून या अनोख्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
पश्चिम, दक्षिण, मध्य आणि पूर्व अशा चार विभागात ही स्पर्धा होणार असून स्पर्धेचा शुभारंभ दि. 20 मे रोजी अहमदनगर जिल्हा कारागृहात होणार आहे. तर पुण्यातील स्पर्धा दि. 21 मे रोजी होणार आहे. पश्चिम विभागातील स्पर्धा दि. 20 ते 30 मे कालावधीत होत असून नगरसह येरवडा, कोेल्हापूर मध्यवर्ती, सातारा आणि कोल्हापूर जिल्हा कारागृहात होणार आहे. दक्षिण विभागातील स्पर्धा दि. 1 ते 10 जून या कालावधीत होत असून मुबंई, ठाणे, तळोजा मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, रत्नागिरी विशेष कारागृह आणि सावंतवाडी जिल्हा कारागृहात होणार आहे.
मध्य विभागातील स्पर्धा दि. 11 ते 20 जून या कालावधीत होत असून औरंगाबाद, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, धुळे, बीड आणि नांदेड जिल्हा कारागृहात होणार आहे. पूर्व विभागातील स्पर्धा दि. 21 ते 30 जून या कालावधीत होत असून नागपूर, अमरावती मध्यवर्ती कारागृह, अकोला, भंडारा, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा आणि वाशिम जिल्हा कारागृहात होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार्या या प्रबोधन रथच्या माध्यमातून दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय चार फूट आकाराची फे्रम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी 100 पुस्तकांचा संच देण्यात येणार आहे.
महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणार्या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांना आणि स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे सदस्य कारागृहात जाऊन स्पर्धेचे परिक्षण करणार आहेत.