धर्मवीर आनंद दिघेंसारखा नेता पुन्हा होणे नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणा-या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. केवळ दिसण्यातील साधर्म्यच नाही तर दिघे साहेबांच्या नजरेतील ती जरब, चेह-यावरचे ते तेजस्वी आणि कणखर बाण्याचे भाव, त्यांची देहबोली, संवादफेक हे सर्वच प्रसाद ओक यांनी एवढं लिलया साकारलं आहे की साक्षात दिघे साहेबच पडद्यावर बघितल्याचा भास होतोय अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून उमटत आहेत. याच धर्मवीर मु. पो. ठाणे चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशन सोहळा मुंबई येथे अनेक मान्यवर आणि चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी आनंद दिघे साहेबांसोबत एका दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी मी पाहिले होते ते काम करताना तहानभूक विसरुन काम करत असत. प्रत्येक कार्यकर्त्याने त्यांच्या सारखे काम करावे. ते प्रत्येकाला प्रेमाने व आपुलकीने जवळ करत. असा नेता पुन्हा होणे नाही. ज्या वेळी ते गेले त्यावेळी त्यांचे वयं पन्नास होते. मी म्हणेन या पन्नास वर्षांत ते शंभर वर्षांचे आयुष्य जगले. चोवीस तास ते कामाला वाहिलेले होते. त्यांचे राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्यासाठी ‘धर्मवीर’ जरूर पाहावा “
मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यात अभिनेते प्रसाद ओक लुकमध्ये मंचावर अवतरले आणि त्यांना बघून उपस्थित असलेले सर्वच जण अवाक् झाले. यावेळी प्रसाद ओक म्हणाले की, “एक कलाकार म्हणून आयुष्यात मनाजोगी भूमिका साकारायला मिळणे, हे फार कमी कलाकारांच्या नशिबात असते. आजवर मी प्रसाद ओक म्हणून अभिनय केला. ‘धर्मवीर’मध्ये मी अशी व्यक्तिरेखा साकारली आहे. जी काही वर्षांपूर्वी हयात होती. हे एक राजकारणातील महान व्यक्तिमत्व होते. ज्यांचे सामाजिक स्थानही तितकेच भक्कम होते. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही याची मोठी जबाबदारी माझ्यावर होती. आतापर्यंत आलेल्या प्रतिक्रियांवरून मी या व्यक्तिरेखेला हुबेहुब साकारल्याचा आनंद आहे. मात्र ती साकारण्यासाठी मला साहेबांच्या कुटुंबियांची, निकटवर्तीयांची बरीच मदत झाली. जेव्हा मी या चित्रपटाचे शूटिंग करत होतो तेव्हा मला अनेकदा असे वाटायचे, तो मी नव्हेच. आरशात पाहताना मला आनंद दिघेंचाच भास व्हायचा. याचे सारे श्रेय ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांना जाते.”
ह्या प्रसंगी सलमान खान म्हणाले, ” मला या चित्रपटाचा ट्रेलर पाहून खूप गहिवरून आले, कारण की, आनंद दिघे यांच्या काळात त्यांनी अनेक समाजकार्य केला आहेत. तसे समाजकार्य आपण सर्वांनी करण्याची खूप गरज आहे. त्यांचे कार्य आजच्या युवापिढीला खूप मार्गदर्शक ठरणार आहे. नक्कीच हा चित्रपट प्रत्येकाला मनापासून आवडेल.”
तर हे शिवधनुष्य पेलणं किती अवघड होतं हे सांगतांना लेखक दिग्दर्शक प्रविण तरडे म्हणाले की, ” मी प्रत्येकवेळी वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट आणण्याचा प्रयत्न करत असतो व प्रेक्षकवर्गाला नवीन काहीतरी दाखवण्याचा मी प्रयत्न करत असतो. एका राजकीय नेत्याचा जीवनपट बनवणे काही सोपे काम नव्हते. पण माझ्या सोबत मंगेश देसाई व झी स्टुडिओ असल्याने या सगळ्या गोष्टी उत्तमरित्या जुळवता आल्या.’’
