तुमचं ‘ब्रेन इंजिनिअरिंग’ होतंय हे तुम्हाला कळायला हवं! – गिरीश कुलकर्णी
पुणे:आजमितीला अनेक माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या ‘कंटेट’चा मारा तुमच्यावर होत असून त्यातून तुमची स्वतःची विचारशक्ती खुंटली जात असेल तर तुमचं ‘ब्रेन इंजिनिअरिंग’ कोणी करतंय का, आणि करत असेल ते होऊ द्यायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवायला हवं असं मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाकडून आयोजित ‘दृष्य माध्यमे, इतिहास आणि समाज’ या विशेष सवांद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इतिहास विभागप्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. संत नामदेव सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
गिरीश कुलकर्णी म्हणाले, आज जेव्हा तुम्हाला मेल येते त्याला उत्तर काय द्यावे हेही तेच सुचवतात. याचाच अर्थ तुम्ही काय कसं वागावं, काय विचार करावा हे ज्यांच्या हातात ही भांडवलशाही आहे अशी माणसं ठरवतात. नफ्यासाठी, राजकीय स्वार्थासाठी याचा वापर होतो. आपण काय प्रकारचा कंटेंट पहावा हेही तेच सुचवतात आणि त्यातून केवळ एकसारखा विचार करणारे कळप तयार होतात. यातून निसर्गतः आपली जी सृजनशीलता, नवनिर्मिती करण्याची दारं बंद होतात. हे सगळं जर थांबायचं असेल तर ते असा कंटेंट पाहणं, वाचणं बंद करणे आपल्या हातात आहे.
ते पुढे म्हणाले, आपली निसर्गातून आलेली सांस्कृतिक मुळं तुटत असून सांस्कृतिक कुपोषण सुरू झालं आहे असं मला बऱ्याचदा वाटतं. माणूस घडण्याची प्रक्रिया ही कुटुंबव्यवस्थेतून आणि शिक्षणव्यवस्थेतून होते. माणुसपणाचा बदल घडवायचा असेल तर तो इथून घडावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
