बाळासाहेब थोरातांनी आधी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी, राज ठाकरेंची चिंता नसावी : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : भाजपाचा मनसेच्या भूमीकांना उघडपणे मिळणारा पाठींबा पाहता मनसे आणि भाजपाच्या युतीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबत युतीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगत या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. तसंच, “राज ठाकरे यांचे अस्तित्व धोक्यात येईल, असं बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. त्यांनी आधी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी, राज ठाकरे यांची चिंता नसावी”, असं वक्तव्य करत बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला आहे.
“भाजपचा अजेंडा जरी बाळासाहेब थोरात यांनी राबवला तरी आम्ही स्वागत करु. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली नसती तरी सभा झालीच असती. सध्या मनसेसोबत युती करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही”, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी नाव न घेता शिवसेना खासदार संजय राऊतांवरही टीका केली. “राजद्रोह, देशद्रोह गुन्हा कशाही वेळी लावला जातो. मातोश्रीच्या समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा संकल्प हा राजद्रोह कसा होऊ शकतो?”, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.