राज्यात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे – नारायण राणे
पुणे:राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही तर फक्त बेबंदशाही चालली आहे. सत्तेत आहेत तेच धिंगाणा घालत आहेत. पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येवून सूड उगवण्याचं काम करत आहेत.
राज्यात खून होत आहेत.दरोडे पडत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले जात नाहीत. त्यामुळे अशा काळात राज्यात राष्ट्रपती राजवट येणं गरजेचं आहे. असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुण्यात पत्रकाराशी बोलताना व्यक्त केले .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी आलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यावरूनही नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेवर कडाडून टीका केली. “या देशात लोकशाही आहे, कोणी हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येत असेल विरोध का? याबरोबरच एका व्यक्तीला एक कायदा आणि दूसऱ्याला दूसरा कायदा का? असा प्रश्न यावेळी नारायण राणे यांनी उपस्थित केला.
नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा कोणावरही अंकूश नाही. नवनीत राणा या खासदार आहेत तर रवी राणा हे आमदार आहेत. मुख्यमंत्री सक्षम आहेत का? त्यांना राज्याचे प्रश्न माहित नाहीत. त्यांचं शेवटचं भाषण अंतिम आठवडा प्रस्तावावार झालं. पण हे भाषण कलानगरच्या नाक्यावरच्या भाषणासारखं होतं. त्यांनी महाराष्ट्राला दहा वर्ष मागे नेले आहे. 89 हजार कोटी तूट असून राज्याची व्यवस्था पूर्ण बिघडली आहे.असे नारायण राणे म्हणाले.
