कोणीही जातीचे राजकारण करून देशाचा एकोपा मोडण्याचा प्रयत्न करु नये – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : राज्यात सध्या हनुमान चालिसा विरुद्ध भोंगा असा वाद राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आज हनुमान जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी हनुमान चालीसा पाठणाचे आयोजन करण्यात आले. तर राष्ट्रवादीकडून मात्र हनुमान आरती आणि इफ्तार पार्टी अशा सर्वधर्म समभाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुण्यात आयोजित या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: उपस्थित होते. यावेळी “भारत हा सर्वधर्म समभाव देश असून हजारो वर्षापासून विविध जाती धर्माचे लोक येथे एकोप्याने नांदतात. आपला देश बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर चालणारा आहे. त्यामुळे कुणीही राजकारण करून देशाचा एकोपा मोडण्याचा प्रयत्न करु नये”, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
यावेळी अजित पवार यांच्या सोबत उपस्थित असलेल्या मुस्लीम कार्यकर्त्याने स्वत: आरती केल्याचं पाहायला मिळालं. तर कार्यक्रमानंतर लगेचच ते इफ्तार पार्टीसाठी गेले. त्यावेळी अजित पवार यांनी प्रसार माध्यमाशि संवाद साधंला.
पवार म्हणाले, देशात जाती जाती वरुन राजकारण आहे. या राजकारणात गरीब लोक भरडले जातात. श्रीमंतांना काहीच अडचण होत नाही. अलीकडच्या काळात सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने चुकीची माहिती त्यावर पसरवून तरुणांना चुकीची माहिती दिली जाते. अशी प्रवृत्ती कोणाची असेल तर त्याला कडक कायदा करुन शासन झालं पाहिजे.