प्रभू रामचंद्रांप्रमाणे वाईट वृत्तीचा नाश करा – इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे
पुणेः भारतीय संस्कृतीमध्ये प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण हे आदर्श पुरूष समजले जातात. प्रभूरामचद्रांनी रावणाचा वध करून वाईट वृत्तीवर मात केली. तसेच आज आपणही वाईट वृत्तीवर मात केली पाहिजे. आजही समाज प्रभूरामचंद्रांची प्रेरणा घेवून आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहे, असे मत इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
पार्वती चव्हाण सोशल फाउंडेशन व श्रीराम अभिमन्यू मंडळ ट्रस्टच्या वतीने रामजन्मोत्सवानिमित्त श्रीराम कर्तव्य पुरस्कार २०२२ चे आजोयन करण्यात आले होते. कसबा पेठेतील चव्हाण श्रीराम मंदिरात हा समारंभ पार पडला. यावेळी माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, पार्वती चव्हाण, गणेश चव्हाण, वीरसेन गायकवाड, मारुतराव देशमुख, अमर जाधव, नितीन यंदे, अरविंद पेटकर, आप्पा गायकवाड, आनंद हरपळे, लक्ष्मण तरवडे, रवींद्र धंगेकर, गणेश नलावडे, शैलेश आंदेकर, विजय शेलार आदी उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे ७ वे वर्ष होते. तर, रामजन्मोत्सवाचे २९ वर्ष होते.
कार्यक्रमात गुरूकुलम्, ममता फाऊंडेशन, संतुलन पाषाण शाळा, अखिल बुधवार पेठ देवदासी संस्था, हेल्प रायडर्स, राष्ट्रीय खेळाडू संजय नाईक, राष्ट्रीय प्रशिक्षक जयवंत उर्फ बाबू घोडके यांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानाचे उपरणे, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. रामनवमीनिमित्त बासरीवादन आणि प्रा. रवींद्र शाळू व यांच्या सहका-यांच्या स्वच्छंद ग्रुप तर्फे भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गणेश चव्हाण म्हणाले, समाजात आज अनेक लोक कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता चांगले काम करीत आहेत. त्यांचे कार्य समाजासमोर येण्यासाठी व त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी श्रीराम कर्तव्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. भोला वांजळे यांनी सूत्रसंचालन केले.
