५/१० वर्षापूर्वी माहित नसलेली ED गावागावात पोहचली : शरद पवार
मुंबई : केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर हा या देशासमोरचा सध्या महत्त्वाचा प्रश्न असल्याचे दिसून येत आहे. प्रसार माध्यमांनी जी आकडेवारी सांगितली ती खरी असेल तर ती स्वच्छ सांगते की राजकीय वा अन्य हेतूने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. अशा शब्दात केंद्राकडून ED चा वापर राजकीय हेतूने केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
स्पष्ट सांगायचे म्हणजे ५-१० वर्षांपूर्वी ईडी नावाची संस्थाच कुणाला माहीत नव्हती. मात्र, आता ही ईडी गावागावात पोहचली आहे. हा यंत्रणेचा गैरवापर दुर्दैवाने सुरू असल्याचे दिसते, असेही ते म्हणाले.
मला राष्ट्रीय सुरक्षेची फार चिंता वाटत आहे. जेव्हा एखादा पेपर फुटतो तेव्हा आपण मोठी चौकशी लावतो. त्यामुळे ईडी-सीबीआय कुणावर रेड करणार आहे, यासंदर्भातील बातम्या जर ४-५ दिवस आधीपासूनच बाहेर येत असतील तर या संस्थांच्या स्वायत्ततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते.