राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी
पुणे : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी “समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल”, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुणे महानगर पालिकेत आंदोलन केले. या आंदोलनाच्या वेळी शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसेच राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप देशमुख, प्राजक्ता जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्षा सीमा सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा मुणाल वाणी, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले, काल राज्यपालांनी एका कार्यक्रमात शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचे विधान केले आहे. त्या विधानाबद्दल राज्यपाल यांनी माफी मागितली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पण शिवाजी महाराज व महाराष्ट्र बद्दल वारंवार चुकीची विधानं करत असतात. या पुणे महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजप पक्षाने शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायला ही विरोध केला आहे. येत्या सहा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. आम्ही नक्की त्यावेळी त्यांना जाब विचारणार आहोत. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे, असे ही
प्रशांत जगताप म्हणाले.
