Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

असंघटित कामगारांसाठी ‘त्रिशरण’चे कार्य वाखाणण्याजोगे – नाना पटोले

पुणे : “समाजातील शेवटच्या घटकाची सेवा आपल्या हातून व्हावी, हा प्रामाणिक उद्देश ठेवून त्रिशरण एनलाईटनमेंट फाऊंडेशन ही संस्था काम करत आहे. असंघटीत कामगारांना प्रशिक्षित करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे त्यांचे मोलाचे कार्य वाखाणण्याजोगे आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

त्रिशरण एनलाईटनमेंट फाऊंडेशनच्या संकेतस्थळ, डॅशबोर्डचे अनावरण पटोले यांच्या हस्ते झाले. मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा वाघमारे, महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष भाई नगराळे, संजय राठोड, श्रीमती खलीपे ताई, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष जेसाभाई मोटवानी यांच्या समवेत त्रिशरण संस्थेचे व्यवस्थापक प्रशांत वाघमारे, विकासदूत प्रकल्पाचे राज्य सन्मवयक दिगंबर वाघ, विकास दूत प्रकल्पाचे विभागीय सन्मवयक शितल कांबळे, परभणी जिल्हा समन्वयक बिरबल सोनकांबळे, संस्थेच्या प्रशिक्षक श्रीमती सांची वाघमारे, पुणे जिल्हा समन्वयक श्रीमती रचना कांबळे, तांत्रिक विभागाचे तेजस गांधी, संस्थेचे सनदी लेखापाल यशवंत मेहता, श्रीमती अलका साबळे, श्रीमती अर्चना बनकर आदी उपस्थित होते. त्रिशरणच्या इतर जिल्ह्यातील प्रतिनिधींनी ह्या कार्यक्रमाला ऑनलाईन च्या माध्यमातून उपस्थिती दर्शविली.

नाना पटोले म्हणाले, “सोसायटी, खाजगी कार्यालये व इतर आस्थापनांमध्ये येणाऱ्या घरेलू कामगार, महिला, मुली यांची पुरूष सुरक्षा रक्षकाकडून तपासणीच्या नावाखाली होणारी छळवणूक थांबवण्यासाठी संस्थेने महिलांना ‘झलकारी’ सुरक्षा रक्षकाचे विशेष प्रशिक्षण देवून जिथे पुरूष सुरक्षा रक्षक असतील तिथे महिलांची तपासणी करणेकरिता महिला सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे याची मोहीम चालू केली, ही आनंदाची बाब आहे. वेबसाईट व डॅशबोर्डच्या माध्यमातून अनेकांना आपले प्रश्न या संस्थेकडे मांडता येणार असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही संस्था गरजू, बेरोजगार, असंघटीत कामगारांचे संघटन करून त्यांना विशेष प्रशिक्षण देवून समाजातील शेवटच्या घटकाला समाजाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करित आहे. या फाऊंडेशनच्या कामाचे स्वरूप पाहता या संस्थेने केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता देशात आपला विस्तार वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.”
प्रास्ताविकात प्रज्ञा वाघमारे यांनी फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रज्ञा वाघमारे म्हणाल्या, “या वेबसाईट आणि डॅशबोर्डच्या माध्यमातून संस्थेच्या ४५०० (स्वयंसेवक) विकासदूत यांना ऑनलाईन ओळखपत्र मिळणार असून विविध विभाग, योजना, समस्यांचे सर्वेक्षण यातून केले जाणार आहे. तळागाळातील लोकांपर्यंत योजनेची माहिती पोहोचण्यासाठी ह्या डॅशबोर्डची निर्मिती केली आहे. गरजूंपर्यंत कुठलीही योजना लवकर पोहोचवता यावी, यासाठी ही नवीन संकल्पना सत्यात उतरतानाचा प्रयत्न करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गाव पातळीवरील तरूण तरूणींना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संस्थेने आजवर कधीही कुठल्या राजकीय व्यासपीठावर कार्यक्रम घेतला नसून, केवळ दीन-दलित, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, उपेक्षित घटकांसाठी कायम निस्वार्थपणे नाना पटोले हे काम करत असल्याने त्यांच्या शुभहस्ते संस्थेच्या वेबसाईट व डॅशबोर्डचा अनावरण कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.” 

सुत्रसंचालन प्रशांत वाघमारे यांनी केले. आभार विकास दूत राज्य सन्मवयक दिगंबर वाघ यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading