पुढील दोन दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार
पुणे : राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. मात्र, पुढील दोन दिवस राज्यात थंडीचा कडाका अजून कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान 10 अंशाखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवसभर वातावरणात गारवा राहणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
आज मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवलं गेलं आहे. त्यामुळ पुढील दोन दिवस राज्यातील कमाल आणि किमान तापमानत घट राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांच्या तापमानात कमालीची घट झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात थंडीची लाट आली आहे. कमाल तापमानात घट दिसणार मात्र किमान तापमानात कोणताही बदल होणार नाही. पुढील 2 दिवस राज्यात शीत लहर कायम राहणार आहे. कमाल आणि किमान तापमानात घट होऊ शकते. दिवसभर वातावरणात गारवा राहू शकतो.
दरम्यान, सध्या राज्यभरात गारठा वाढला आहे. सलग तिसऱ्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यात थंडीची लाट कायम असून या भागातील तापमान 5 अंश सेल्सियसवर गेलं आहे. तर, तोरणमाळ परिसरात दव बिंदू गोठल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार सुरू आहे. गोंदियात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसवर आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे.
