मैदानाच्या नामकरणावरून सरकार दडपशाही करत आहे – चंद्रकांत पाटील
पुणे : मुंबईच्या मालाडच्या मालवणी परिसरातील क्रीडा मैदानाचे वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल असे नामकरण आज करण्याचे प्रयत्न सत्ताधारी काँग्रेसकडून केले जात आहेत. याचा लोकार्पण सोहळा आज उरकण्यात आला. मात्र त्यापूर्वी भाजपनं तिथं जोरदार आंदोलन केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा तिथे सामना रंगला आहे. त्यावर मी सरकार आणि पोलीस प्रशासनाचा निषेध करतो, मैदानाला नाव देण्यावरून सरकार दडपशाही करत आहे. हे थांबवा अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पत्रकारांशी बोलताना दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, या मैदानाला टिपू सुलतान हे नाव देणं आम्हाला हे मान्य नाही. भाजपचा आंदोलनाला पाठिंबा आहे. येथे काँग्रेस नगरसेवकाने बोर्ड लावले काय किंवा इतर कुणीही लावले असतील तर ते बोर्ड उखडून काढले पाहिजेत, असेही पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची तब्बेत ठीक राहावी हीच प्रार्थना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत काही दिवसापासून ठीक नाही त्यामुळे ते घरी आहेत. विरोधी पक्ष सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,
उद्धव ठाकरेंच्या तब्बेतीवर आम्ही कधीही बोललो नाही, सदैव त्यांची तब्बेत ठीक राहावी हीच प्रार्थना केली आहे, मात्र त्यांनी जिथे शेतीचे नुकसान झाले आहे तिकडे जावे.काल अपघात झाला तिकडे त्यांनी जावे. यावर आम्ही बोललो होतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुंबईत भाजपचा महापौर असेल
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये कित्येक वर्षे शिवसेनेचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेवर राहिला आहे. पण मागच्या निवडणुकी मध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली त्यामुळे राज्यात शिवसेना आणि भाजप हे विरोधी पक्ष एकमेकांसमोर उभे राहिले. त्यामुळे मुंबईच्या महापौरांवरा वरून वाद निर्माण झाला आहे. .त्यावर पाटील म्हणाले,मागच्या वेळेसच आमचा महापौर झाला असता माञ अमीत शाहा यांनी सांगितलं की सेनेला द्या.माञ आता तस होणार नाही. यावेळी मुंबईत भाजपचा महापौर होणार. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये 117 पेक्षा जास्त जागा मिळणार असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
