पंतप्रधानांना कॅण्डल लाईट डिनर देण्याचा मान फक्त पुणेकरांचा
पुणे :- पुणेकर हे आपल्या पाहुणचारासाठी सर्वत्र खूपच प्रसिद्ध आहेत. साठीच्या दशकात झालेल्या एका अश्या घटनेमुळे पुणेकरांचा पुण्याच्या आदरातिथ्या बद्दलचा अभिमान अजूनही वाढेल. गेली ७५ वर्षात भारतातील कुठल्याही शहराने आतापर्यंत पंतप्रधानांसाठी ऑफिशियल रिसेप्शन कॅण्डल लाईट डिनर आयोजित केलेले नाही. पण हा मान फक्त पुण्याकडेच आहे. अशी माहिती पुण्यातील श्री कम्युनिकेशन (shree communication Public relations) या जनसंपर्क व समाज माध्यम संस्थेच्या संचालिका सीमा खंडागळे यांनी दिली.

त्या पुढे म्हणाल्या की,१४ मे १९६१ साली देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून मानद पदवी देण्यात आली होती. या पदवी समारंभानंतर विद्यापीठाने पंतप्रधानांसाठी ऑफिशियल रिसेप्शन आयोजित केले होते.तेव्हा अवकाळी पावसामुळे गणेश खिंड भागातील वीज ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्यामुळे विद्यापीठाच्या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला. शिवाय त्यावेळी जनरेटरची सुविधा नसल्यामुळे पंतप्रधानांसाठी आयोजित रिसेप्शन हे मेणबत्त्याच्या प्रकाशात आयोजित करण्यात आले होते. पण या घटनेचा पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही व त्यांनी या मेजवानीचा आनंद घेतला. अश्या प्रकारचे अधिकृत रिसेप्शन हे आतापर्यंतच्या आजी व माजी १५ पंतप्रधानासाठी पुणे सोडून कोणत्याही शहराने आयोजित केलेले नाही. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे तत्कालीन कुलपती श्रीप्रकाश व कुलगुरू द. गो. कर्वे उपस्थित होते.
माझ्या संस्थेला एका उद्योग समूहाने भारताच्या माजी पंतप्रधानांच्या आर्काइव्हची निर्माती करण्यासाठी पथदर्शी प्रकल्पाची निर्मिती करण्यास सांगितले होते. तेव्हा मला ही माहिती पुणे पोलीस दलाचे त्याकाळातील अधिकारी मधुकर हेबळे यांच्या दस्तावेजात मिळाली. तसेच माझ्या पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी ही या गोष्टीला दुजोरा दिला.
