Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

सरकार कुणाचेही असो सोशित-वंचितांकडे मात्र दुर्लक्षच – इ. झेड. खोब्रागडे

पुणे : चांगल्याला चांगले म्हणण्याची प्रवृत्ती कमी होत असून मानसिक खच्चीकरण करण्यासाठी एक वर्ग काम करत आहे. आजच्या जमान्यात ‘बॉस’ हा सर्वज्ञ नाही, अशिक्षित माणसाकडेही शहाणपण आहे. संविधानामुळे देशातील करोडो नागरिकांच्या जीवनात प्रकाश आला. देशात आज अनेक विचित्र घटना घडत असताना संविधानानुसारच देशात परिवर्तन होऊन लोकशाही मजबूत होईल, असा विश्वास निवृत्त सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केला. सरकार कुणाचेही असो सोशित-वंचितांकडे मात्र सरकारचे दुर्लक्षच होत आले आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल विलास राजपूत, पंचवीस पदव्या प्राप्त केल्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल डॉ. बबन जोगदंड, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्शुरन्स सर्व्हेअर या संस्थेच्या सीईओ व राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राहुल जाधव, जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागातील मुख्य अभियंतापदी पदोन्नती मिळाल्याबद्दल मिलिंद जीवने यांचा सत्कार खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महात्मा फुले पगडी, शाल आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (बानाई), महाराष्ट्र राज्य व ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिशन पुणेतर्फे पत्रकार भवन येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती तर सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त सचिव जी. एम. कंधारे अध्यक्षस्थानी होते. बानाईचे अध्यक्ष पांडुरंग शेलार, ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास बनसोडे व्यासपीठावर होते.

खोब्रागडे पुढे म्हणाले, सत्कारार्थींना सत्कारमूर्ती न म्हणता सत्कार नायक म्हटले गेले पाहिजे. सत्कारामुळे काम करण्याची प्रेरणा मिळते. अभियंता हा काही केवळ पूल, रस्ते बांधत नाही तर समाजबांधणीचेही काम करतो. अभियंत्याच्या कार्याचा फायदा देशातील प्रत्येक घटकाला होत आला आहे.

अ‍ॅड. जयदेव गायकवाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून देशांत क्रांती घडविली. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी केला. डॉ. बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करून ते जनतेसमोर मांडले गेले पाहिजे. बाबासाहेब यांचा विचार आज फक्त भावनिक अंगाने केला जातो त्यांचा वैचारिच संघर्ष समजून घेण्याची गरज आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading