देशातील सर्व मदरशांवर बंदी घातली पाहिजे -तेलंगणाचे आमदार राजासिंग ठाकूर
पुणे: ज्या मदरशांमध्ये मुलांना शिक्षण देणे अपेक्षित आहे. अशा ठिकाणी दहशतवादी निर्माण करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळेच आसामच्या मुख्यमंत्र्यांनी तेथील मदरशांवर बंदी घालण्याची घोषणा केली. अशाप्रकारे मी सर्व मुख्यमंत्र्यांना विनंती करतो कि, देशातील सर्व मदरशांवर बंदी घालावी, असे आवाहन तेलंगणाचे आमदार राजा सिंग ठाकूर यांनी केले.
शिवप्रताप दिनानिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठानतर्फे कर्वेनगर येथील जय शिवराय चौकात झालेल्या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील हिंदू एकता आंदोलनाचे विक्रम पावसकर यांना आमदार राजा सिंग ठाकूर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्रविण दबडघाव यांच्या हस्ते शिवप्रताप पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पवळे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, श्री महावतार बाबाजी मठाचे मठाधिपती गुरुश्री, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले, पतित पावनचे सिताराम खाडे, हिंदुराष्ट्रसेनेचे प्रवीण झेंडे, इस्कॉनचे संजय भोसले, नगरसेवक सुशील मेंगडे, दीपक पोटे, दीपक नागपुरे, गणेश घोष, समीर पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
राजा सिंग ठाकूर म्हणाले, आज देशामध्ये हिंदू सुरक्षित नाही. लव जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींवर अत्याचार होत आहेत. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना नष्ट करण्याचे काम सुरू आहे. खुर्ची आणि पद तात्पुरते असते पण हिंदुत्व कायमस्वरूपी राहणार आहे. त्यामुळे देशातील नेत्यांनी पद आणि खुर्चीसाठी काम न करता हिंदुत्वाच्या रक्षणाचे काम करावे, असे आवाहन राजा सिंग ठाकूर यांनी यावेळी केले.
विक्रम पावसकर म्हणाले, शिवप्रताप दिन संपूर्ण देशांमध्ये साजरा केला पाहिजे. हिंदूंवर अत्याचार करणा-यांची एकी आहे. परंतु हिंदूंची एकी नाही हे आपले दुर्दैव आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण घराघरांमध्ये पोहोचवली पाहिजे आणि हिंदू एकता संपूर्ण देशात निर्माण केली पाहिजे.
मिलिंद एकबोटे म्हणाले, हिंदू हा नेहमी विजयाचे प्रतीक राहिला आहे. राजे शिवराय प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नाहीत, तर त्यांनी कोरोना काळामध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण कायार्मुळे ते कोवीड योद्धे ठरले आहेत.
महेश पवळे म्हणाले, अफजलखान ही केवळ व्यक्ती नसून वृत्ती आहे, ही वृत्ती आजही क्षणाक्षणाला हिंदू धर्म नष्ट करण्याचे संधी शोधत आहे. ही वृत्ती ठेचून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण घराघरात दिली पाहिजे.
