थकबाकीदारांना मागच्या वर्षी दिलेली दंडमाफी रद्द करावी
विवेक वेलणकर यांचे महानगरपालिकेला पत्र
पुणे : पुणे महापालिकेचे उत्पन्न वाढावे व थकबाकीचा बोजा कमी होण्यासाठी लागोपाठ दुसऱ्यावर्षी थकबाकीदारांसाठी महापालिकेने अभय योजना लागू केली आहे. ज्यात ७५ टक्के दंड माफ केला जाणार आहे. कोणतीही अभय योजना म्हणजे नियमितपणे कर भरणाऱ्या प्रामाणिक नागरीकांना त्यांच्या वक्तशीरपणाची शिक्षाच असते. यातून कर थकवणेच अधिक फायदेशीर असा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे थकबाकीदारांना मागच्या वर्षी दिलेली दंडमाफी रद्द करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी महापालिकेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
या पत्रात वेलणकर यांनी म्हटले आहे की, नव्याने सुरू केलेल्या अभय योजनेचा फायदा घेणाऱ्या मालमत्ता कर थकबाकीदारांना ते भविष्यात कधीही थकबाकीदार झाले, तर अभय योजनेत दिलेली दंडमाफी रद्द करण्यात येईल अशी अट घालावी. जेणेकरून यापुढेही आपण असाच कर थकवत राहू, परत काही वर्षांनी अभय योजना येईल अशा भावनेतून जाणूनबुजून कर थकवण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल. गेल्यावर्षी ज्या थकबाकीदारांनी अभय योजनेचा फायदा घेतला आहे, ते यंदाही थकबाकीदार झाले असतील तर गेल्यावर्षी त्यांना दिलेली दंडमाफी रद्द करावी, असेही वेलणकर यांनी सांगितले आहे.
