Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

मध्यवर्ती पेठांतील रस्ते २० जानेवारीपर्यंत होणार पूर्ववत – हेमंत रासने

पुणे : मध्यवर्ती पेठांतील महत्त्वाचे रस्ते २० जानेवारीपर्यंत पूर्ववत होतील अशी ग्वाही स्थायी समितीचे अध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक हेमंत रासने यांनी दिली.
केळकर रस्ता आणि टिळक रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ आज रासने यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. नगरसेविका गायत्री खडके, माजी नगरसेवक दीलीप काळोखे, कसबा मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, उदय लेले, किरण जगदाळे, दीलीप पवार, निलेश कदम, मनिष जाधव, सौरभ रायकर, अनिल बेलकर, विनायक रासने, संकेत थोपटे, परेश मेहेंदळे, योगिता गोगावले, रीना सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

रासने म्हणाले, मध्यवर्ती पेठांच्या भागात मुख्य बाजारपेठ असल्याने, तेथे दररोज मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे गेली पंचेचाळीस वर्षे या भागातील पाणीपुरवठा आणि मैलापाण्याचे वहन करणार्या वाहिन्या बदलताना मर्यादा येत होत्या. कोविडमुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बाजारपेठ बंद होती. त्या काळात समान पाणीपुरवठा, मैलापाणी वहन, एमएनजीएल पुरवठा, इंटरनेट कंपन्या यांच्या वाहिन्या आणि केबल्स टाकण्याची विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात आली. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात खोदाई करावी लागल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली होती. या पूर्वी निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था होत होती. आता सर्व प्रमुख रस्ते पूर्ववत करण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू करण्यात आले आहे.

रासने म्हणाले, गेल्या महिन्यात आयुक्त विक्रम कुमार आणि महापालिका अधिकार्यांसोबत या भागातील विविध विकासकामांची पाहाणी करण्यात आली होती. त्यानुसार विकासकामांचे कालबद्ध नियोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले मंडईसमोरील मेट्रोचे काम, दक्षिणमुखी मारूती मंदिर चौकातील रस्त्याची कामे, शनिवारवाड्याच्या पिछाडीचा भाग, शुक्रवार पेठ, सुभाष नगर, बाजीराव रस्ता परिसरातील समान पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील विकासकामे, हिराबाग चौकातील वर्षानुवर्षे पडलेली बेवारस वाहने उचलणे आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सदाशिव पेठ, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता परिसरातील रस्ता डांबरीकरणाची कामे टप्प्‌याटप्प्याने हाती घेण्यात आली असून, ती २० जानेवारीपर्यंत पूर्ण होतील.

 

सदाशिव पेठ-शनिवार पेठ या प्रभागाला एक एकक मानून विविध प्रकारची विकासकामे खात्यांतर्गत समन्वयातून पूर्ण करण्यात यावीत यासाठी १३ नोव्हेंबर रोजी आयुक्त विक्रम कुमार यांच्या समवेत या भागातील समस्या आणि विकासकामांची माहिती घेण्यासाठी दौरा आयोजित करण्यात आला होता. जशा समस्या या प्रभागात आहेत तशाच त्या अन्य ४१ प्रभागांमध्ये आहेत. या दौर्यातून विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याची नियोजनबद्ध अंमलबजावणी सुरू केली आहे. पुणेकरांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अन्य प्रभागांमध्ये या आराखड्याची अंमलबजावणी करावी असे आदेश प्रशासनाला दिल्या असल्याचे रासने यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading