Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

देशाच्या सिमेपेक्षा घराच्या बॉर्डरवर एकटे जगणे अवघड – ब्रिगेडियर (निवृत्त) प्रसाद जोशी यांचे मत

पुणे :  प्रत्येक सैनिकाचे कुटुंब त्याच्यापासून हजारो मैल लांब असते. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्या सैनिकाची आई किंवा पत्नीवर असते. मुलांना वाढविणे, त्यांना चांगले संस्कार देणे, शिक्षण देणे या सर्व जबाबदा-या त्या स्त्रिला पार पाडाव्या लागतात. या सर्व जबाबदा-या ही स्त्री लिलया पेलते, त्यामुळे सैनिक सिमेवर देशाचे रक्षण एकाग्रपणे करु शकतात. देशाच्या सिमेपेक्षा घराच्या बॉर्डरवर वीरमाता आणि वीरपत्नींनी एकटे जगणे अवघड असते, असे मत ब्रिगेडियर (निवृत्त) प्रसाद जोशी यांनी व्यक्त केले.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित शारदीय नवरात्र उत्सवात भारतीय सैनिकांच्या वीरमाता व वीरपत्नींच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन मंदिरात करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, रमेश पाटोदिया, प्रविण चोरबेले, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, शिरीष मोहिते आदी उपस्थित होते.

भारतीय सैनिकांच्या वीरमाता व वीरपत्नी असलेल्या उर्मिला मिजार, सुमेधा चिथडे, भारती गुप्ते, सरिता साळुंखे, सुजाता हसबनीस, मंगला भुवड, सुषमा जोशी यांनी गौरविण्यात आले. साडीचोळी, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कारगिलसह विविध युद्धांमध्ये सहभागी व सियाचीनमध्ये आॅक्सिजन प्रकल्प उभारणा-या वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला.

सन्मानाला उत्तर देताना सुमेधा चिथडे म्हणाल्या, भारतीय सैनिक आणि सैन्यदल आम्हा वीरमाता व वीरपत्नींना हे कार्य करण्याची प्रेरणा देतात. राष्ट्रप्रथम या भावनेने सैनिक जगत असतात. त्यामुळे आम्ही त्या सैनिकांसाठी सियाचीनमध्ये आॅक्सिजन प्रकल्प उभारण्याकरीता पुढाकार घेतला.

अमिता अग्रवाल म्हणाल्या, वीरमाता आणि वीरपत्नी यांचे कार्य सैनिकांप्रमाणेच मोठे आहे. सिमेवर जाऊन देशसेवा करणा-या सैनिकांच्या पाठिशी या खंबीरपणे उभ्या आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान मंदिरातर्फे केला जात आहे. श्री महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org यावरुन आॅनलाईन पूजा संकल्प तसेच  फेसबुक पेज  व  युट्यूब तसेच स्थानिक केबलवर जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading