Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्स – एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे :  अवजड वाहनांमुळे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ठाणे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सर्व संबंधित यंत्रणांची बैठक घेतली. भविष्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अशा वाहतूक कोंडीला समारे जावे लागू नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स नियुक्तीची घोषणा पालकमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केली.

या बैठकीत रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देतानाच दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत दुपारी १२ ते ४ वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना दिले. त्याचप्रमाणे, जेएनपीटीकडे ये-जा करणाऱ्या वाहनांचे नियमन करण्यासाठी नवी मुंबई, पालघर, पडघा याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग लॉट उभारण्याचे निर्देशही  शिंदे यांनी दिले.

पालकमंत्र्यांनी  आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी  ठाणे पोलिस आयुक्त जय जीत सिंग, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले आदी यावेळी उपस्थित होते. तर रायगड, पालघरचे जिल्हाधिकारी, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई महापालिका आयुक्त, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई पोलिस आयुक्त, ठाणे ग्रामीण व पालघरचे पोलिस अधीक्षक, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, एनएचएआय, मेट्रो, जेएनपीटी आदी यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

असा आहे टास्क फोर्स

या टास्क फोर्समध्ये ठाण्याचे जिल्हाधिकारी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते), अधीक्षक अभियंता, पीडब्ल्यूडी ठाणे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त यांच्यासह एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एनएचएआय आदी यंत्रणांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. पावसाळ्याआधी रस्त्यांचा आढावा घेऊन रस्त्यांची डागडुजी दर्जेदार पद्धतीने होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्याचे, तसेच पावसाळ्यात खड्डे पडल्यास दोषींवर कारवाई करण्याचे अधिकार या टास्क फोर्सला असतील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. त्यातच अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री श्री. शिंदे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सोबत घेत शुक्रवारी शहरातील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामाची पाहणी केली, तसेच कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा ठाणे शहराशी संबंधित नसलेली अवजड वाहने शहरातून जात असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात शहराच्या सीमांवर पार्किंगची व्यवस्था करून अवजड वाहनांचे नियमन करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले. तसेच, शहराच्या सीमांवर कायमस्वरूपी ट्रक टर्मिनल्स उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश ठाणे व रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading