राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार
पुणे:गेल्या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस मान्सूनने ब्रेक घेतल्यानंतर आता राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. येत्या काही दिवसांत बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्याची स्थिती तीव्र झाल्यास राज्यात आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज एकूण 15 जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
आज मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या 15 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट सांगितण्यात आला आहे. राज्यात पुढील काही तासांत वेगावान वाऱ्याच्या साथीने जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस राज्यात कमी अधिक फरकाने हीच स्थिती कायम राहणार आहे.
गेल्या आठवड्यात विश्रांती घेतल्यानंतर मुंबईसह पुणे परिसरात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालं आहे. पुढील तीन दिवस मुंबई आणि पुण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तिन्ही दिवस पुण्याला हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही तासांत याठिकाणी धुव्वाधार पावसाची शक्यता आहे.
