मराठा आरक्षण – तीन पक्षांची राजकीय ठगेगिरी सुरू :आशिष शेलार
कराड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तीन पक्षांची ठगेेगिरी सुरू असल्याचा आरोप रविवारी भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आणि माध्यमांमध्ये मराठा आरक्षणावर सविस्तर भूमिका मांडली आहे. राज्यांना स्वत:च्या अखत्यारीत आरक्षण देण्यापासून सर्वोच्च न्यायालयाने मज्जाव केलेला नाही. आरक्षणाचा कायदा टिकाऊ करण्यासाठी आयोगाची निर्मिती करण्याची गरज आहे, असं आशिष शेलार म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, राज्यस्तरीय आयोगामार्फत ऐतिहासिक, सांख्यकी आणि इम्पिरीकल डेटा जमा केला पाहिजे. त्या आधारावर सरकारने मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर करावा. हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर केल्यावर तो सभागृहात मंजूर करून घ्यावा. नंतर हे विधेयक राष्ट्रपतींकडे गेल्यावर सूचीमध्ये बदल करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. आरक्षणाबाबतची ही अशी प्रक्रिया आहे. पण हे सरकार शेवटचं पाऊल आधी सांगतं. पायाभरणी न करता इमारत उभी राहिली असं अभासी चित्रं निर्माण करण्याचं पाप केलं जात आहे. हे जाणूनबुजून केलं जात आहे. त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. कायदेशीररित्या योग्य टप्पे पूर्ण न करता आरक्षणाबद्दल राज्यकर्ते भ्रम निर्माण करत आहेत, असा आरोप शेलार यांनी केला आहे. केंद्रीय कृषी कायदे रद्द करू म्हणणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेने तर मोदींच्या कृषी कायद्यांना तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यात काही सुधारणा केल्या आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.