Saturday, September 5, 2026
ENTERTAINMENTLatest News

सारेगमप लिटील चॅम्प्समुळे आयुष्यच बदलून गेलं – कार्तिकी गायकवाड  

सारेगमप लिटील चॅम्पच्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड देखील परिक्षक म्हणून या कार्यक्रमात झळकतेयं. घराघरात पोहोचलेल्या गायिका कार्तिकी गायकवाडला परिक्षकाच्या खुर्चीत बसलेलं पाहून तिच्या चाहत्यांना तर आनंद झालाच आहे आणि याच निमित्ताने कार्तिकी सोबत साधला हा खास संवाद
१. १२ वर्षांनी पुन्हा एकदा सारेगमप लिटिल चॅम्प्स’चं नवीन पर्व सुरु झालं आहे. त्याबद्दल काय सांगशील?
– या पर्वाची उत्सुकता खूपचं होती आणि आता हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. झी मराठीवरील प्रत्येक कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे आणि सारेगमप लिटिल चॅम्प्सचं पहिलं पर्व हे खूप गाजलं. प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम आम्हाला मिळालं आणि आता या नवीन पर्वाची दमदार सुरुवात नुकतीच झाली आहे, यातील स्पर्धक खूप उत्तम आहेत, आणि प्रेक्षक या पर्वाला देखील प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत याचा मला आनंद आहे.
२. सारेगमप या कार्यक्रमाने तुम्हा ५हि पंचरत्नांना संगीत क्षेत्रात मोठा ब्रेक दिला, त्याच मंचावर पुन्हा एकदा तुम्ही आहेत पण एका वेगळ्या भूमिकेत, कसं वाटतंय?
– सारेगमपच्या मंचाने आमची ओळख निर्माण केली, या कार्यक्रमामुळे आमच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. या कार्यक्रमातील आमचा प्रवास हा आमच्यासाठी अविस्मरणीय असा आहे. एक आई जशी आपल्याला बाळाला नेहमी जवळ करत असते तसंच झी मराठीने सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या आमच्या पर्वा नंतरदेखील आम्हाला अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे आमची कला सादर करण्याची संधी दिली त्यामुळे आमची या कार्यक्रमाशी असलेलं नातं अधिकचं दृढ होत गेलं आणि आता पुन्हा याच मंचावर ज्यूरीच्या भूमिकेतून आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आलो आहोत त्यामुळे एक वेगळी जबाबदारी आहे.
३. १२ वर्षांनंतर तुम्ही पाच जण एकत्र आला आहात, त्याबद्दल काय सांगशील?
– आमच्या पर्वानंतर ३ ते ४ वर्ष आम्ही ५ही जण अनेक कार्यक्रमांसाठी एकत्र आलेलो. पण त्यानंतर सगळ्यांच्या वयक्तिक कारकिर्दीमुळे आमचं फारसं भेटणं झालं नाही. पण आता पुन्हा एकदा आम्ही लिटिल चॅम्प्सच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत आणि आमच्या पर्वात आम्ही जेवढी धमाल केली तेवढीच धमाल आता आम्ही या पर्वात करतोय.
४.ज्यूरीच्या भूमिकेसाठी काही खास तयारी केली का?
– ही भूमिका अतिशय जबाबदारीची भूमिका आहे. त्यामुळे आपलं ठाम मत असणं खूप महत्वाचं आहे. तसंच या पर्वात अनेक नवीन गाणी ऐकायला मिळतील तेव्हा त्याची तयारी आणि त्यावर स्पर्धकांना मार्गदर्शन करण्याकडे आमचा कल असेल.
५. सारेगमपच्या मंचांमुळे तुझ्यात काय बदल झाला?

– या मंचामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदललं. अतिशय कमी वयात आमच्यातील कला तमाम रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. त्यांचं प्रेम आम्हाला मिळालं आणि इतकंच नव्हे तर अनेक दिग्गज मान्यवरांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले. या पर्वातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे आणि त्याचसोबत मी या मंचाकडून खूप काही शिकले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading