ओबीसी आरक्षण – २६ जूनला महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन – पंकजा मुंडे
मुंबई – ओबीसींचे राजकीय आरक्षण सुरक्षित ठेवण्याच्या प्रक्रियेचा भाग तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारमधील सर्व मंत्री हा विषय हाताळत होते. आज ओबीसींच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ओबीसींच्या आरक्षणामध्ये राजकीय बाबतीत जो अन्याय झालाय तो दूर केल्याशिवाय आणि इम्पेरिकल डेटा तयार करुन ओबीसींच्या हक्काचे आरक्षण मिळवल्याशिवाय राज्यात निवडणूका होऊ देणार नाही. या भूमिकेवर ठाम असल्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले.
येणाऱ्या काळात भाजपमधील प्रत्येक नेते राज्यातील सर्व भागात जाऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करतील आणि २६ जूनला संपुर्ण महाराष्ट्रात चक्का जाम ओबीसींचा हा तीव्र संताप रस्त्यावर आणण्याची भूमिका घेतली असल्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. न्यायालयात दाद मागणार आहोत की, जस्टिस कृष्णमुर्ती यांनी जो निर्णय दिला आहे. त्या निर्णयाला दिशाभूल करुन केंद्राकडे बोट दाखवण्याचे काम राज्य सरकार करत असून ते चूकीचे आहे. आत्ता न्यायालयात दाद मागून इम्पेरिकल डेटाच्या आधारावर ओबीसीच्या आरक्षणाच्याबद्दल जसा निर्णय भाजपने घेतला होता आणि जशी पाऊले उचलली तशी महाविकास आघाडी सरकारने उचलली पाहिजेत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
“आज आम्ही सत्तेमध्ये नाही विरोधी पक्षामध्ये आहोत. विरोधी पक्षाचे काम आहे की, सरकारच्या चुकांवर बोट ठेवणं जागृतपणे डोळ्यात तेल घालून सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणं हे करणारच आहोत. पण जेव्हा भाजप सत्तेत होतं तेव्हा भाजपमधील नेते आणि मंत्री मागण्यासाठी रस्त्यावर उतरलो नाही. मोर्चे काढले नाही तेव्हा निर्णय घेतले कारण निर्णय घेण्याच्या क्षमतेध्ये होतो. आज दुर्दैवाने सरकारमधले मंत्री ओबीसींवर अन्याय झाला म्हणून मोर्चा काढतात, ओबीसींच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात. ओबीसींच्या भविष्याबाबत हा संपुर्ण खेळखंडोबा सरकारने सुरु केला आहे. असा घणाघात पंकजा मुंडे यांनी केला आहे.
ओबीसी आरक्षणासाठी २६ जूनला चक्काजाम आंदोलन करणार आहोत. ओबीसींच्या हक्कासाठी पक्ष आणि राजकारणाचा विषय येत नाही. परंतु आंदोलन करणार असल्यामुळे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
