विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होणार तर पुण्यात मध्यम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
पुणे – कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस काही भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी पडणार आहे. काही ठिकाणी आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकणात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत सकाळपासून उन्हाचा चटका आहे. त्यामुळे कमाल तापमानात चांगलीच वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात वातावरणातील बदलामुळे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. मात्र, दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. कोकणातही तापमानात चढउतार होत आहे. मंगळवारी सकाळच्या आठ वाजेपर्यंत खानदेशातील जळगाव येथे ४०.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी कमाल तापमानाची नोंद झाली.
उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते लक्षद्वीपपर्यंत द्रोणीय क्षेत्र कायम आहे. तर वायव्य बंगालचा उपसागर व लगतच्या भागापासून ते पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत पूर्व पश्चिम कमी दाबाचा पट्टा आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई या भागात आज आणि उद्या या दोन दिवस अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतही अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. विदर्भातही आज तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस मंगळवार संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ.बुधवार संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ.गुरूवार मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.शुक्रवार मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.