आजच्या काळात माणसांमध्ये दयाभाव असणे गरजेचे- किरण बेदी
पुणे : आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत करणे, त्यांना उपयोगी पडणे ही चांगली गोष्ट आहे. वैज्ञानिकदृष्टया देखील हे सिध्द झाले आहे कि दयाभाव हा स्वभाव आपल्याला अनेक फायदे मिळवून देतो. आजच्या काळात दयाभाव असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे माणसाने माणसाला मदत करण्याची जाणीव निर्माण होईल, असे मत माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी व्यक्त केले.
जैन सोशल ग्रुप युथ पुणे सेंट्रल तर्फे परिवर्तन – द अॅक्ट आॅफ काईंडनेस या स्पर्धेचे आयोजन आॅनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. याचे उद््घाटन किरण बेदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष प्रितम भटेवरा, आनंद चोरडिया, पवन भंडारी, धीरज ओस्तवाल, दीपा बाफना, प्रिती बर्मेचा यांसह इतर सहकारी उपस्थित होते. भारतासह सिंगापूर, दुबई, बँकॉक, नायजेरिया आणि जर्काता आदी देशांमधून देखील 2 हजारहून अधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन आणि आॅल इंडिया जैन कॉन्फरन्स यांचे सहकार्य देखील उपक्रमाला मिळाले.
किरण बेदी म्हणाल्या, परिवर्तन द – अॅक्ट आॅफ काईंडनेस हा उपक्रम अतिशय चांगला आहे. पंतप्रधानांच्या मन की बात या कार्यक्रमात याचा नक्की समावेश होऊ शकतो. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवे. आमच्या संस्थेमध्ये व सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरीता हा उपक्रम राबविण्याकरीता देखील प्रयत्न करणार आहे. लहान वयातच दयाभाव हा गुण आई-वडिलांनी मनात रुजवला होता. यासाठीच पोलीस क्षेत्रात मी आले. लोकांना शिक्षा नाही तर त्यांच्यामध्ये परिवर्तन घडविण्यातची शिकवण मला लहानपणीच मिळाली, असेही त्यांनी सांगितले.
उपक्रमाविषयी प्रितम भटेवरा म्हणाले, समाजात वावरताना सर्वांशी प्रेमाने वागणे व मदत करीत रहाणे, अशी शिकवण प्रत्येकाला लहानपणापासून मिळायला हवी. त्यामुळे लहान मुलांमध्ये दयाभाव व सत्कृत्य करण्याची भावना जागृत करण्याकरीता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा वयवर्षे ७ ते ९, ९ ते १२ आणि १२ ते १५ या तीन वयोगटांत होणार आहे. जैन सोशल ग्रुप पुणे परिवार आणि जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल महाराष्ट्र रिजन यांच्या सहयोगाने स्पर्धा होत असून प्रकाश धारीवाल माणिकचंद ग्रुप व सुहास खाबिया यांचे सहकार्य मिळाले आहे.
